Sambhajiraje Chhatrapati Agitation: खासदार संभाजीराजे हे कालपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, राज्यातील विविध भागातून संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. तसेच राजकीय नेते देखील आझाद मैदानावर संभाजीराजेंची भेट घेण्यासाठी येत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजीराजेंच्या उपोषणावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या अखत्यारीत जे मुद्दे आहेत, ते आपण सोडवू असे आश्वासन दिले आहे.


आंदोलनाला बसू नये असे अवाहन खासदार संभाजीराजेंना केले होते, असे अजित पवार म्हणाले. राज्य सरकारच्या अखत्यारीत जे मुद्दे आहेत, ते सोडवू, मात्र जे राज्याच्या अखत्यारीत नसतील ते सोडवणे कठीण असल्याचे अजित पवार म्हणाले. केंद्र सरकार पार्लमेंटमध्ये तशा पध्दतीचे बिल काढू शकते, प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राकडे आग्रह धरावा, परंतू अशा प्रकारे न बसता मार्ग काढावा असेही अजित पवार म्हणाले. तसेच यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडमेकर यांनी देखील आंदोलनस्थळी भेट दिली.


कोण काय म्हणाले?


उद्धवजींकडे जाणार आणि लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावणार :  शिवसेना खासदार अरविंद सावंत


माझ्या राजघराण्यातील राजा उपोषणाला बसला आहे. एक मराठा उभा आहे तुमच्यासमोर, लाख मराठा म्हणून बोलत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले. शब्द एकच देईल, उद्धवजींकडे जाणार आणि लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावणार असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. राजे तुमच्या प्रकृतीला बाधा येईल असं काही न करता लवकर प्रयत्न करणार, तुमच्या मागण्या मांडेन असे सावंत म्हणाले.


आम्ही त्वरीत मुख्यमंत्र्यांकडे जाणार  : किशोरी पेडणेकर, महापौर 


आम्ही त्वरीत मुख्यमंत्र्यांकडे जात आहोत. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल. आपला राग मी समजू शकते उगाच रागात आवेशात काही चुकीचं करु नका असे वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.  
न्याय तुम्हाला देखील मिळणार आहे. पक्ष प्रमुखांशी भेटणार आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी बोलणार असल्याचे पेडणेकर म्हणाले.


मला याबाबत कोणाला दोषी धरायचे नाही, समाजाला न्याय मिळायला हवा ही माझी प्रमाणिक इच्छा असल्याचे संभाजीराजे यावेळी म्हणाले. सगळ्यांच्या भावना आक्रोश मी समजू शकतो. मी 2007 पासुन या लढ्यात आहे 
मी टिका करण्यासाठी उपोषण करत नाही. समाजाला वेठीस धरु नये असेही संभाजीराजे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार मार्ग काढू शकते असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला. गरीब मराठा समाजाला न्याय द्या, 
आताचा राग कोणाबद्दल नाही असेही संभाजीराजे म्हणाले. मला कोणाला दोषी धरायचे नाही, या समाजाला न्याय मिळायला हवा ही माझी प्रमाणिक इच्छा असल्याचे संभाजीराजे म्हणाले.