Ajit Pawar on Farmer waiver Off : महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जाहीरनाम्यामध्ये घोषणा (Ajit Pawar on Farmer waiver Off) केली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर निधीचे कारण देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यासंदर्भात सातत्याने विरोधकांकडून टीका होत असताना आज (2 मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अक्षरशः हात झटकले. त्यामुळे कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राज्यामध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी दिलं आहे का?

कोल्हापुरात या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी दिलं आहे का? मी दिलं आहे का? मी तरी दिलेलं नाही, असं म्हणत एक प्रकारे या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता शेतकऱ्यांमध्ये रोज असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.  महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आलं होतं. दरम्यान, लाडकी बहीण हप्त्याच्या संदर्भाने अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की लाडक्या बहिणी योजनेचं आम्ही नियोजन केलं आहे. आदित्य तटकरे यांनी सांगितल्यानंतर तातडीने नियोजन केलं असून सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार म्हणाले. 

दरम्यान, पालकमंत्रीपदावरून बोलताना अजित पवार यांनी काही अडलं आहे का? अशी विचारणा केली. ते म्हणाले की रायगडला पालकमंत्री दिलं नाही म्हणून काही अडलं आहे का? सर्व कामे होत आहेत, कोण काय बोललं याबद्दल मला विचारू नका, असं म्हणत त्यांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला. 

राज्याचे मुख्यमंत्री पहलगाम हल्यातील अतिरेक्यापेक्षाही क्रूर 

दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी कर्जमाफीचे खोटी आश्वासने दिल्याने दररोज राज्यातील सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री पहलगाम हल्यातील अतिरेक्यापेक्षाही क्रूर झाले असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. माळसोन्ना ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रेत त्यांनी सडकून टीका केली. महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन पाळून तातडीने राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील संपुर्ण कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने शेतकऱ्यांच्या  लेकरा-बाळांना अनाथ करून त्यांच्या पत्नीचे कूंकू पुसण्याचे पाप केले जात आहे. फडणवीसांनी 100 दिवसाच्या सरकारच्या कार्याचे मूल्यमापन करताना शेतकरी आत्महत्या किती झाल्या याचा लेखाजोखा तपासावा म्हणजे तुमच्या अपयशाचा आरसा तुम्हाला दिसेल, असे ते म्हणाले. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती व्यवसाय तोट्यात चाललेला आहे. देशातील 6.50 लाख हेक्टर त राज्यातील 3.50 लाख हेक्टर शेतीपासून कमी झालेली आहे हे विदारक चित्र केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाचा आरसा आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबविण्यात येणारे आयात-निर्यात धोरण, नैसर्गिक आपत्ती, सततची नापिकी, पिकविमा कंपन्यांची नफेखोरी, दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी यासारखी संकटांनी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या