Deepak Kesarkar On Homework:  शिक्षण विभाग पुढील वर्षीपासून एक धाडसी निर्णय घेण्याचा तयारीत आहे. कारण पुढल्या वर्षीपासून चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा विचार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी काल सांगितला आहे. पुन्हा एकदा मंत्र्यांनी निर्णयाआधीच आपला विचार मांडला आणि शिक्षण क्षेत्रात याच विचारावर चर्चा सुरू झाली. शिक्षक पालक शिक्षणतज्ञ यावर मत मांडायला सुरू झाले. पण खरंच गृहपाठ बंद करण्याचा निर्णयाआधीचा हा विचार कितपत योग्य आहे? खरंच यांनी विद्यार्थ्यांचा ताण कमी होणार? की शिक्षण क्षेत्रात यामुळे समस्या निर्माण होणार? हा निर्णय राज्यात खरंच अस्तित्वात येऊ शकतो का? असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत. 


विद्यार्थ्यांचा शाळेतला घरचा अभ्यास, गृहपाठ म्हणजेच होम वर्क कायमचा बंद होणार आहे. म्हणजेच शाळेतून आल्यानंतर पुन्हा वह्या काढा! पुन्हा उजळणी करा आणि लिहा आणि ते पुन्हा दुसऱ्या दिवशी शिक्षकांकडून तपासून घ्या! हे काम बंद करण्याचा विचार शिक्षण विभागाचा आहे. म्हणजेच शाळेतून आल्यानंतर विद्यार्थ्याला ओवर बर्डन, विद्यार्थ्याला दिला जाणारा गृहपाठाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं शालेय शिक्षण मंत्री म्हणत आहेत.


गृहपाठ बंद केल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकतं का ? गृहपाठ नेमका कसा असावा किंवा त्याची व्याख्या काय आहे ? विद्यार्थ्यांना ताण न येऊ देता गृहपाठ दिला जाऊ शकतो का ? परदेशात शिक्षण पद्धतीमध्ये गृहपाठाला स्थान आहे ? का या सगळ्या संदर्भात आम्ही काही तज्ज्ञांशी चर्चा केली. गृहपाठ म्हणजे घरी जाऊन विद्यार्थ्यांनी आवडीने करायचा अभ्यास, गृहपाठ लादला जाऊ नये. गृहपाठ बंद जरी केला तरी फारसा फरक पडणार नाही, शिक्षण तज्ज्ञ मधुरा फडके यांचं मत आहे.


होमवर्क बंद करायचा झाल्यास मधला मार्ग काढावा


जागतिक पातळीवर आपल्या शैक्षणिक दर्जा फारसा चांगला नसल्याने विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नाही आणि त्यांची तयारी करावी लागते त्यामुळे गृहपाठ कायमचा बंद करणे कितपत शक्य आहे? बंद करायचा झाल्यास मधला मार्ग काढावा, असं शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणतात. गृहपाठ बंद करण्याचा विचार मंत्र्यांनी मांडल्यानंतर यावर चर्चा- लिखाण सोशल मीडियावर केले जातंय. राज्यातल्या सर्व शाळांमध्ये इतकं परिपूर्ण शिक्षण दिलं जातं का की विद्यार्थ्यांना घरी त्याची उजळणी करण्याची गरज नाही? गणित, इंग्रजीसारखा विषय जिथे सरावाची गरज असते तिथे सुद्धा गृहपाठ बंदच करायचा का? असा सवाल केला जात आहे. 


डिसले गुरुजींकडून निर्णयाचं स्वागत


या निर्णयाचं ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh  Disale Guruji)  यांनी स्वागत केले आहे.  मुलांच्या पाठीवर असणारे ओझे कमी करत असताना अभ्यासाचे ओझे कमी करून मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी असे निर्णय घेणे गरजेचे वाटते, अशी प्रतिक्रिया डिसले गुरुजींनी एबीपी माझाला दिली आहे. डिसले गुरूजी म्हणाले, मुलांच्या पाठीवर असणारे ओझे कमी करत असतानाच अभ्यासाचे ओझे कमी करून मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी असे निर्णय घेणे गरजेचे वाटते.  याची अंमलबजावणी करण्यापूर्वी शिक्षकांना यासाठी प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. अर्थात पालकांना हा निर्णय कितपत आवडेल याबाबत मला शंका आहे. मी सध्या अमेरिकेतील शाळांमध्ये जातोय, तिथे देखील मुलांना गृहपाठ दिले जात नाहीत. अर्थात असा निर्णय घेताना शिक्षक, पालक यांना विश्वासात घ्यावे लागेल.


सर्व घटकांशी शिक्षण विभागाला चर्चा करणे गरजेचे


कुठल्याही इयत्तेसाठी असू द्या, गृहपाठ बंद करण्याचा निर्णय घेण्यात सर्व बाजूने सर्व घटकांशी शिक्षण विभागाला चर्चा करणे गरजेचे आहे. गृहपाठ बंद करण्याऐवजी त्याला मध्यम मार्ग कोणता जेणेकरून विद्यार्थी आवडीने कुठलाही ताण तणाव न घेता स्वतःहून अभ्यास करेल, यावर सुद्धा शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.


शिक्षणमंत्री महोदयांनी विचार समोर मांडला आणि निर्णयाच्या आधीच या विचाराची शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू झाली. निर्णय होईल तेव्हा होईल पण आता निर्णयाआधी विचार मांडताना एकदा तरी शिक्षकांशी, शिक्षण तज्ञांशी, विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांशी बोलावं. संवाद साधावा आणि मगच विचार प्रकट करावे आणि हाच खरंतर मंत्र्यांसाठीचा गृहपाठ असतो. 


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra News : विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी, गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार


Exclusive : गृहपाठ बंद करण्याचा निर्णय मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा : रणजितसिंह डिसले गुरुजी


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI