#ओलादुष्काळ : राज्यात ओला दुष्काळ सरकारने जाहीर केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच फार मोठे नुकसान झालं आहे, मात्र राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ केली जात आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे शेतकऱ्यांची कार्यशाळा आणि अभ्यास मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाटील बोलत होते. जिथं जिथं लोकांचे नुकसान झाले अशा सर्व तालुक्यांमध्ये ओला दुष्काळाच्या उपाययोजना ताबडतोब सुरू केल्या पाहिजेत, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. 


जयंत पाटलांचा केजरीवालांना टोला 


दरम्यान, केजरीवालांचा पक्ष आता गुजरात निवडणूक लढवणार आहे, आपण हिंदू देवतांना मानतो हे दाखवण्याचा प्रयत्न केजरीवाल करत असावेत. नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आहे, कारण गांधींना जगमान्यता आहे. आता नोटेवर देव देवता आणि महापुरुषांचे फोटो लावणे अशा मागण्या पुढे येत असून त्यामुळे वाद निर्माण होतील. आता जी पद्धत आहे तीच चालू ठेवणे योग्य असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 


ते पुढे म्हणाले, आपल्या देशात आपण अनेक देवांना मानतो, गाईच्या पोटामध्ये तर 33 कोटी देव आहेत. त्यामुळे कुठल्या देवाचा फोटो छापावा असा प्रश्न निर्माण होइल आणि त्यातून नाराजी निर्माण होऊ शकते. त्यामुळे केजरीवाल यांची सूचना स्वीकारणं एवढं सोपे नाही, असा टोला ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. 


आटपाडीमध्ये पाण्याचा समान वाटा मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांची कार्यशाळा


दरम्यान, आटपाडी, सांगोला आणि तासगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावा आटपाडी मधील कृषितंत्र विद्यालयाच्या प्रागणात  पार पडला. प्रत्येकाच्या शेताशेतापर्यंत मोजुन पाणी देणारी यंत्रणा येत्या मे महिन्या पर्यंत पुर्ण करण्यासाठी, हक्काचे पाणी, दोन पाळ्यांमधील काळात, आपल्या ताब्यात मोजुन घेऊन, पाहिजे ती पिके घेण्याची यंत्रणा उभी करण्याचे प्रशिक्षण सुरु करण्यासाठी हा शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. भारत पाटणकर यांची उपस्थिती होती.