डहाणू बोट दुर्घटना, बोट मालकावर हलगर्जीपणाचा गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 13 Jan 2018 11:24 PM (IST)
खलाशी महेंद्र अंभीरे यांनी आपण विद्यार्थ्यांना बोटीत न बसण्याचा सल्ला दिल्याचं म्हटलं आहे.
पालघर : डहाणू बोट दुर्घटनेत आता पालघर पोलिसांनी बोट मालक धीरज अंभीरे, बोट चालक पार्थ अंभीरे आणि खलाशी महेंद्र अंभीरे यांच्यावर हयगयीचा गुन्हा दाखल केला आहे. खलाशी महेंद्र अंभीरे यांनी आपण विद्यार्थ्यांना बोटीत न बसण्याचा सल्ला दिल्याचं म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना महेंद्र अंभीरे यांनी ही माहिती दिली. विद्यार्थी बोटीवर सेल्फी घेण्याच्या मोहापायी बोटीच्या एका बाजूला सरकले आणि ही दुर्घटना घडल्याचं डहाणूची राणी बोटीचे खलाशी महेंद्र यांनी सांगितलं. बोट कलांडताना आपण आणि आपला पार्थ अंभीरेने विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यातील समुद्रात तब्बल 40 जणांचा जीव धोक्यात सापडला. मात्र 32 जणांचं नशिब बलवत्तर होतं. तर 3 विद्यार्थिनींना आपला प्राण गमवावा लागला. या घटनेतील 5 जण अजून बेपत्ता आहेत. के. एल. पोंडा हायस्कूलची 40 मुलं पिकनिकसाठी समुद्राकाठी आली. तिथे महेश अंबिरे यांची बोट मुलांनी भाड्याने घेतली. समुद्रात 300 मीटरवर फेरी मारताना मुलांनी फोटोसेशनही केलं. मग वेळ आली सेल्फीची.. सेल्फीसाठी मुलं बोटीच्या एका बाजूला आली.. आणि बोटीचा बॅलन्स गेला.. यातच बोट उलटली.. संबंधित बातमी : डहाणूत सेल्फीच्या मोहाने 40 जणांची बोट समुद्रात उलटली