मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कृषीउत्पन्न बाजार समित्यांमध्ये 18 ऑक्टोबर 2017 पासून सुरु करण्यात येणार आहे. शिवाय, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करण्यात येईल. राज्याचे सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली. शिवाय, शेतकऱ्यांनी कापूस हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करू नये, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.


कापूस हंगाम 2017-2018 मध्ये कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात झाले असून शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघ व कॉटन कॉपोर्रेशन ऑफ इंडियाच्या वतीने हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यासाठी राज्यात पणन माहासंघाचे 60 खरेदी केंद्र व आणि सीसीआय (कॉटन कॉपोर्रेशन ऑफ इंडिया) चे 120 खरेदी केंद्र सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा दर्जेदार कापूस बाजारपेठेत आणावा. चांगल्या प्रतीचा कापूस माफक आर्द्रतायुक्त असावा याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. दर्जेदार कापसाची हमीभावाने खरेदी केली जाईल, असेही पणनमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने कापसाच्या विविध जातींचे दर जाहीर केले आहे. ब्रम्हा जातीच्या कापसासाठी 4 हजार 320 रुपये प्रती क्विंटल, एच-6 जातीच्या कापसासाठी 4 हजार 220 रुपये प्रती क्विंटल एलआरए जातीच्या कापसाठी 4 हजार 120 प्रती क्विंटल असे हमी दर जाहीर केले आहेत.

चांगल्या प्रतीचा कापूस योग्य दारात विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन पणन मंत्र्यांनी केले आहे.