बुलडाणा : कोरोनाचे संकट आता शहरातून पार खेड्यापर्यंत पोहचलं आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षामध्ये शनिवारी सकाळी ठेवण्यात आलेल्या एका 46 वर्षीय व्यक्तीचा अवघ्या तासाभरातच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुलडाणा शहरातीलच एका खासगी रुग्णालयामध्ये गेल्या तीन दिवसांपूर्वी त्याच्यावर उपचार होते सुरू. त्याचा निमोनिया अधिक वाढत गेला. त्यामुळे त्याची प्रकृती ढासळली होती. परिणामी राज्यात आतापर्यंत बळींची संख्या आठ झाली आहे.


प्रकृती खालवल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे तो आयसोलेशनमध्ये असतानाच तासाभरात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याचे स्वॅब नमुने तातडीने नागपूर येथे विषाणू तपासणी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आज आला असून तो रुग्ण पॉझिटिव्ह निघाला होता. याअगोदर एका 40 वर्षीय महिलेचा मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल शनिवारी या माहिलेला छातीत दुखू लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनानं 5 बळी घेतले आहेत. तर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातून मुंबईत उपचारासाठी आलेल्यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.


CoronaUpdate | ही आणीबाणीची स्थिती, कोरोनाविरोधातील लढाईत सर्वजण एकवटल्याचं समाधान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


राज्यात कोरोना संक्रमितांचा आकडा वाढतोय
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 196 झाली आहे. यामध्ये मुंबई व ठाणे परिसर 107, पुणे 37, नागपूर 13, अहमदनगर 03, रत्नागिरी 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03, मिरज 25, सातारा 02, सिंधुदुर्ग 01, कोल्हापूर 01, जळगाव 01, बुलढाणा 01असा तपशील आहे. राज्यातील मुंबई 14, पुणे 15, नागपूर 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03 असे 34 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. आत्ता 155 जणांवर उपचार सुरू आहेत. तर, देशात कोरोना बाधितांच्या संख्येने हजारचा टप्पा पूर्ण केला आहे. देशात आत्ताच्या घडीला 1050 कोरोनाचे रुग्ण आहेत. यात सर्वाधिक 196 महाराष्ट्रात आहे. त्याखालोखाल केरळमध्ये 182 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. यातून अत्यावश्यक सेवांना वगळ्यात आलं आहे.


Mann Ki Baat | देशवासियांची माफी मागतो, कोरोनामुळे कठोर निर्णय घ्यावे लागले - पंतप्रधान नरेंद्र मोदींची मन की बात