Buldhana Chikhla Village Bandh: बुलढाण्यातली चिखला काकडमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चिघळला; गावात संचारबंदी लागू, 23 जणांना अटक
Buldhana Chikhla Village Bandh: बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला असून आता गावात संचारबंदी लागू करण्यात आलीय.

Buldhana Chikhla Village Bandh: बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातल्या चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अनधिकृत पुतळा बसवल्याचं प्रकरण चांगलंच चिघळलं आहे. हा वाद गेल्या चार दिवसांपासून सुरू असून आता गावात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर कारवाईही केली आहे. पोलिसांकडून गावच्या सरपंचासह 23 जणांना अटक करण्यात आली आहे.
मध्यरात्री शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली. यावेळी शेकडो शिवभक्त उपस्थित होते. परवा याच गावात शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून दोन गटात वाद होऊन तणाव निर्माण झालेला. याच पार्श्वभूमीवर कलम 163 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली असून समाज माध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केलं आहे. तसेच, दोन गटात झालेल्या वादा प्रकरणी चिखलात काकड येथील आरोपी सरपंच गणेश काकड यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
चिखला गावातील पुतळ्याबाबतची कागदपत्र 'एबीपी माझा'च्या हाती
बुलढाण्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड या गावात बिना परवानगी छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर दोन गटात तणाव निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली . हा पुतळा 4 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास आज्ञातानं चिखला काकड इथल्या अंगणवाडी परिसरात बिना परवानगी बसवला. पोलीस प्रशासनाच्या अहवालानुसार, हा पुतळा विनापरवानगी बसवण्यात आल्यानं हटवण्यात यावा, असा अहवाल 5 फेब्रुवारी रोजी महसूल प्रशासनाला बीबी पोलिसांनी दिलेला. यावर सखोल चौकशी करून महसूल प्रशासनानं आणि तहसील कार्यालय लोणार यांनी स्थानिक ग्रामपंचायतीला हा पुतळा योग्य कारवाई करून या ठिकाणाहून हटवावा, असा आदेशही 11 फेब्रुवारी रोजी दिला. सोबत हा पुतळा विनापरवानगी अज्ञातानं बसवल्यानं हा पुतळा हटवावा, असा आदेश महसूल प्रशासनानं दिला आहे. या सर्व बाबींची कागदपत्रं 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहेत.
वंजारी समाजाकडून 'सत्य कथन मेळाव्याचं आयोजन'
बुलढाण्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवरायांचा अज्ञात व्यक्तीनं अंगणवाडी परिसरात पुतळा स्थापित केला. त्यानंतर महसूल प्रशासनानं हा पुतळा विनापरवानगी असल्यानं तिथून हटवावा, असा आदेश ग्रामपंचायतीला दिले आहेत. मात्र या गावात दोन दिवसांपूर्वी दोन गटात पुतळ्यावरून वाद झाल्यानं मोठा तणाव निर्माण झालेला. यावेळी दोन गटात झालेल्या वादाच्या प्रकरणी पोलिसांनी चाळीसच्यावर लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर 23 आरोपींना अटक केली आहे. मात्र पोलिसांच्या या सर्व कारवाईच्या विरोधात आज चिखला काकड परिसरातील वंजारी समाजानं चिखला गावापासून चार किलोमीटर दूर असलेल्या बीबी गावात वंजारी समाजाचा सत्य कथन मेळावा आयोजित केला आहे. राज्यातील वंजारी समाजाला या मेळाव्याला येण्याचं आवाहन केलं आहे. या मेळाव्यात चिखला काकड गावात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती मांडण्यात येणार असल्याचा दावा वंजारी समाजाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

























