मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावरुन राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. काँग्रेस आमदारांनी सामूहिक राजीनाम्याची तयारी केल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस आमदारांच्या भावना तीव्र असून सामूहिक राजीनाम्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.


काँग्रेसच्या वतीने आज राज्यपालांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं. शिवाय या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. काँग्रेस यामध्ये सर्व प्रकारचं सहकार्य करायला तयार आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिली.

दरम्यान, मराठा मोर्चाच्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची मागणीही अशोक चव्हाण यांनी केली. गुन्हेगार नसतील तर गुन्हे मागे घेतले पाहिजेत. मराठा, धनगर आणि मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाला काढला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.

अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेचं वरातीमागून घोडं आहे. जर या मुद्द्याबाबत ते गंभीर असतील तर सरकारमधून बाहेर पडावं, असं ते म्हणाले. दरम्यान, काल सांगलीत बोलतानाही त्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांनी राजीनामे द्यावेत, असा टोला लगावला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचीही बैठक

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचीही मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली आणि राज्यातील परिस्थितीबाबत माहिती दिली. शिवाय लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची विनंती केली.

शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व आमदारांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 'मातोश्री'वर बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

संबंधित बातम्या :

राज-उद्धव यांचा मराठा आरक्षणाला विरोध, नारायण राणेंचा दावा

मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता आरक्षण द्या: उद्धव ठाकरे