नागपूर :  नागपूर (Nagpur)  जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी (Bank Scam) काँग्रेस नेते  सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.  नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला सुनील केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली असून कोर्टाचे आदेश पाठवले होते. त्यानंतर विधीमंडळाने केदार यांच्या आमदारकीचा निर्णय घेण्यात आला आहे. 


2001-2002 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे (शेयर्स) खरेदी केले होते.  मात्र, पुढे या कंपन्यांकडून कधीच बँकेला खरेदी केलेले रोख मिळाले नाही, ते बँकेच्या नावाने झाले नव्हते. धक्कादायक म्हणजे पुढे रोखे खरेदी करणाऱ्या या खाजगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या.  या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी रोखही दिले नाही आणि बँकेची रक्कमही परत केली नाही असा आरोप आहे.तेव्हा फौजदारी गुन्ह्याची नोंद होऊन पुढे सीआयडी कडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता.  तपास पूर्ण झाल्यावर 22 नोव्हेंबर 2002 रोजी सीआयडीने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. हा खटला तेव्हापासून विविध कारणांनी प्रलंबित होता. 


सुनील केदार रुग्णालयात


सुनील केदार यांच्यावर सध्या  शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मायग्रेनमुळे  सुनिल केदार यांना  ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. मायग्रेनमुळे त्यांना तीव्र डोकेदुखी असल्याने ऑक्सिजन ठेवले  आहे.  सुनील केदार यांना काल नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या रोख घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांचा कारावास आणि साडेबारा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मायग्रेनमुळे तीव्र डोकेदुखीसह छातीत दुखत असल्याची तक्रार केली. तेव्हा काल रात्रीच डॉक्टरांनी केदार यांच्या ईसीजी, रक्ताच्या चाचण्यांसह इतरही काही चाचण्या केल्या होत्या. छातीतील इसीजीमध्ये थोडे बदल आढळून आले.


2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा


नागपूर जिल्हा बँक  घोटाळ्यातील खटल्याचा निकाल आज  लागला. यामध्ये काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.