मुंबई : कोरोना काळात आपण घरातच राहून काम करत असल्यामुळे विरोधकांकडून होणारी टीकेची झोड आणि एकंदर परिस्थितीची आपल्याचा जाणिव असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्राचीच असल्याचं म्हणत त्यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेत पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी आवाहन केलं. 


रविवारी त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससह राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही धोका असल्याचं सांगण्यात आलं असलं तरीही या चिमुकल्यांच्या पालकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी राज्यातील जनतेला धीर दिला. 


लहान मुलांच्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला पाळा आणि चिमुकल्यांवर घरीच कोणतंही औषध देऊन उपचार करु नका, असं महत्त्वाचं आवाहन त्यांनी केलं. कोरोना काळातील संकटांचा आढावा घेत राज्य शासन सर्वतोपरी पावलं उचलत असून, नागरिकांनीही आतापर्यंत सहकार्य केलं तसंच यापुढंही करालं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 


कोरोनाच्या संकटाची तीव्रता पाहता लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कठोर होता, पण लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत आपली कटुपणा घेण्याची तयारी आहे असं म्हणत त्यांनी आपली ठाम भूमिका मांडली. राज्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळंच कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 






18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याची राज्याची तयारी 


राज्यात सध्याच्या घडीला 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याची आपली तयारी असल्या म्हणत त्यांनी लसींचा पुरवठाच होत नसल्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळे येत असल्याची वस्तुस्थिती सर्वांपुढे मांडली. 12 कोटी लसींचे डोस एकरकमी घेण्याची तयारी यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.