Eknath shinde : शिवसेनेचे बंडखोर आमदार 11 दिवसानंतर मुंबईत परतले. आज त्यांचा मुक्काम मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आहे. तीन आणि चार जुलै रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन होणार आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजप यांच्या ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली.  या बैठकीमध्ये आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,  'आज खऱ्या अर्थाने भाजपा-सेना युतीचे सरकार आले, याचे चित्र डोळ्यापुढे आहे. बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिले, ते पूर्ण झाले आहे. ' बंडखोर आमदार आणि भाजपची बैठक पार पडल्यानंतर 'भाजपा-सेना युतीचा विजय असो' अशा घोषणा देण्यात आल्या. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, दरम्यानच्या सरकारच्या काळात वीर सावरकर यांचा अपमान, दाऊद संबंधाचा आरोप झालेल्या मंत्र्याचा बचाव, हे सारे अस्वस्थेचे विषय बनत चालले होते. शिवसेनेचे अधिक नुकसान होतेय हे पाहणे त्रासदायक होते. नेतृत्वाला सांगण्याचे प्रयत्न खूप झाले, पण दुर्देवाने त्यात यश आले नाही, म्हणून आजची स्थिती निर्माण झाली.


आपण मतदारांना न्याय देऊ शकलो नाही, तर आपल्या आमदारकीचा उपयोग काय? हाच सर्वांचा विचार होता. येत्या वर्षभरात अडीच वर्षाच्या कामाचा अनुशेष भरून काढू, देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेतच. त्यांना कामाचा अनुभव प्रचंड आहे. कठीण कामे सोपी कशी करायची हे त्यांना ठावूक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांनी दिली. त्यांचा आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा सुद्धा मी आभारी आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपा-सेना वेगळी होती, असे इतके वर्ष कधी वाटले नाही. दरम्यानच्या काळात थोडे दूर गेल्यासारखे झाले. पण आता पुन्हा एकत्र आलो आहोत. मूळ परिवार एक झाला आहे. आपल्यासोबत आलेले हे बाळासाहेबांचे सच्चे सैनिक आहेत. बाळासाहेबांचा खरा विचार घेऊन जे सोबत आले, त्यांना बळ देणे ही आपली जबाबदारी आहे. आता एकत्र वाटचाल आपल्याला करायची आहे. महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव आपल्याला सर्वांना मिळून प्राप्त करून द्यायचे आहे.


उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवड
विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे  आगामी काळात अध्यक्ष महोदय असं कुणाला संबोधलं जाणार याचा निर्णय उद्या होणार आहे.  दरम्यान, या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. पण हा व्हिप आम्हाला लागू होत नाही, बहुमत आमच्याकडे आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.