मुंबई: मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्या घटनेनंतर या प्रकरणातील आरोपींना दोषींना अटक केली जात आहे. अशातच काल या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटेला (Jaydeep Apte) पोलिसांनी अटक केली. काल(बुधवारी) उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे. त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. जयदीप आपटे (Jaydeep Apte) हे गेल्या 11 दिवसांपासून फरार होता. पोलिसांच्या सात टीम त्याचा शोध घेत होत्या. काल त्याला अटक करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपटे (Jaydeep Apte) पळून पळून कुठे जाणार होता? असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


मी परवाच सांगितलं होतं, आपटे पळून पळून कुठे जाणार आहे. त्याची चौकशी होईल कठोर कारवाई होईल. या प्रकरणातील दोषीला मग तो कोणीही असो त्याला सरकार सोडणार नाही. जे लोकं अफवा पसरवत होते त्यांना चपराक मिळाली आहे. छत्रपती आराध्य दैवत आहे, झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दुर्घटना झाली त्या ठिकाणी पुन्हा एकदा शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाणार आहे, या घटनेचं राजकारण करणं देखील दुर्दैवी आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 


जयदीप आपटेला मालवण येथील दिवाणी न्यायालयात पोलिसांनी केलं हजर


राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्या प्रकरणी जयदीप आपटेला मालवण येथील दिवाणी न्यायालयात पोलिसांनी हजर केलं आहे. वकील गणेश सोवनी आणि वकील राजू परुळेकर हे जयदीप आपटेची (Jaydeep Apte) बाजू मांडणार आहेत. सहआरोपी चेतन पाटील याचीही पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यालाही न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस बंदोबस्तात दोघांनाही न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अॅड. तुषार भणगे युक्तीवाद करणार आहेत. तर काही वेळात युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 


कसा जाळ्यात सापडला जयदीप आपटे


पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्त्वाखालील पोलिसांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटेला (Jaydeep Apte) कल्याणमधील राहत्या घरातून ताब्यात घेतले. यापूर्वी मालवण पोलिसांचे पथक जयदीप आपटे याच्या घरी आले होते तेव्हा घराला कुलूप होते. परंतु, बुधवारी जयदीप आपटे अचानक आपल्या राहत्या घरी अवतरला आणि अलगद पोलिसांच्या हाती लागला. जयदीप आपटे याला ताब्यात घेतल्यानंतर तातडीने सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना करण्यात आले.


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्टला कोसळला होता. तेव्हापासून जयदीप आपटे हा फरार होता. अनेक दिवसांच्या शोध मोहिमेनंतरही पोलिसांना त्याचा पत्ता लागला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकार आणि गृहमंत्रालयावर टीकेची झोड उठवली होती. पोलिसांनी जयदीप आपटे याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथकं विविध ठिकाणी शोध घेत होती. जयदीप आपटे (Jaydeep Apte) इतके दिवस हाती लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. परंतु, बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटे अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला.