मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. आजच्या निर्णयामुळे घराणेशाही मोडीत निघाल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. पक्ष कोणाचीही खासगी मालमत्ता नसते असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. 


आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकालवाचन केलं. यावेळी त्यांनी दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निर्णय दिला. पण खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं म्हटलं. निवडणूक आयोगाचा निकालाला दुजोरा देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. तसेच सुप्रीम कोर्टाने भरत गोगावले यांचा अवैध ठरवलेला व्हीप हा विधानसभा अध्यक्षांनी वैध 
ठरवला. 


नेमका निकाल काय? 


महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन आज पार पडलं. आणि एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केलीय. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय.


सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिलीय. आणि निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच, निकालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केलाय. दरम्यान, निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच, या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.


हेही वाचा : 


Sanjay Raut : 'औकात क्या है तुम्हारी' आजचा निकाल हा कोणताही निर्णय नाही, हे षडयंत्र, संजय राऊतांचा घणाघाती वार