जालना : गेल्या 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. जरांगे यांनी गेल्या काही दिवसांपासून पाणी घेणं देखील बंद केलं आहे. तसेच आपलं आमरण उपोषण आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते सोडणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती. त्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले असून, ते मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहे. सोबतच मनोज जरांगे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आपलं उपोषण सोडण्याची शक्यता आहे. 


मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. तर याच पार्श्वभूमीवर सरकारने मराठा आरक्षणाचा तोडगा सोडवण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांच्याकडे मागितला होता. त्यामुळे जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला असून, उपोषण मात्र कायम असणार असल्याचे सांगितले होते. तसेच आपलं अमरण उपोषण मुख्यमंत्री यांच्या हस्ते सोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्री अंतरवाली गावात पोहोचले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे उपोषण मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.