Abhijeet Dipke on Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या 'अराजकतावादी' टीकेला काॅकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित टीपकेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेलो होतो, जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात, जय भीमच्या घोषणा अराजकता आहेत का? अशी विचारणा केली आहे. अभिजित म्हणाला, फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा विचार करावा ते यूपी चे मुख्यमंत्री नाही ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत जो महाराष्ट्र सुधारणावादी आहे, सेक्युलर आहे पुरोगामी विचारांचा आहे.
राजीनाम्याशिवाय कमी काही मंजूरच नाही
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा तुम्ही नाही घेऊ शकत तर मग दुसरे प्रश्न कसे सुटणार? उत्तरदायित्व निश्चित झालं पाहिजे, व्यवस्था तेव्हाच फिक्स होईल जेव्हा कोणीतरी जबाबदारी घ्यायला तयार असेल, असे त्याने सांगितले. तो म्हणाला, केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करून चालणार नाही. राजीनाम्याशिवाय कमी काही मंजूरच नाही. तुम्ही नुसतं ट्रान्सफर केलं, काय लायकी ठेवली जे स्टुडंट आहेत ज्यांनी आत्महत्या केली आहे. शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी निश्चित होत नसेल तर यात पंतप्रधानांचीही जबाबदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेन युद्ध थांबू शकतात तर पेपर लीक थांबू शकतात, असा टोलाही त्याने लगावला.
फक्त भाजपवाले आणि आयटीसेलवाले भारतीय आहेत का?
गेल्या 10-12 वर्षांपासून जे हिंदू-मुस्लिम राजकारण सुरू आहे त्यातून कोणाला नोकरी मिळत नाही किंवा कोणाची परीक्षा चांगली होत नाही, त्यामुळे सरकारला आपला फोकस आणि प्राधान्यक्रम बदलावा लागेल. मला तुम्ही पाकिस्तानी म्हणता, तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणता, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता मग कोण भारतीय आहे, फक्त भाजपवाले आणि आयटीसेलवाले भारतीय आहेत का? असा सवालही त्याने केला. अभिजितने सांगितले की, आमची प्रेरणा महात्मा गांधी, आंबेडकर, नेहरू, भगत सिंह आहेत. विचारधारा कोणत्या एका पक्षाची नाही. फक्त पाच वर्षातून एकदा मत देणं म्हणजे पॉलिटिक्स नाही. पॉलिटिक्स म्हणजे तुम्हाला पाचही वर्ष ज्यांना मत दिलं त्यांना प्रश्न विचारणं पॉलिटिक्स असतं. त्यांनी राजकारणाला केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवले आहे, पण आम्ही 'मुद्द्यांचे राजकारण' करत आहोत, असे त्याने सांगितले.
तुम्ही घाबरता आणि या सरकारला प्रश्न विचारत नाही
पालकांच्या भीतीबद्दल अभिजितने सांगितले की, मला माहिती आहे जेव्हा तुमचे लेकरं काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल, पण घाबरू नका, तुम्ही घाबरता आणि या सरकारला प्रश्न विचारत नाही. त्यामुळे आज नीट (NEET) सीबीएसईसारख्या भानगडी होत आहेत आणि त्यामुळे आपल्या लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त होत आहे. जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार तोपर्यंत सिस्टम नीट होणार नाही. सिस्टम नीट करायची म्हणजे आधी आवाज उठवावाच लागेल, असे त्याने सांगितले.
जंतर मंतरवर मिळालेल्या प्रतिसादाबद्दल अभिजितने सांगितले की, सिक्कीम, केरळ, ओरिसा, बंगाल, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि काश्मीर अशा देशभरातून तरुण आले होते. पूर्ण जंतर मंतर भरून गेलं होतं ते एक मेसेज होता की आजचा तरुण आता घाबरणार नाही या सरकारला. आता सहा दिवसाचा अल्टिमेटम आहे. जर त्यांनी सहा दिवसात राजीनामा नाही दिला आम्ही पुन्हा एकदा आंदोलन अजून वाढवणार आहे आणि देशभर करणार आहोत, असा इशारा दिला.
इतर महत्वाच्या बातम्या
