बीड : गोदावरीत पाणी आणून संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनी आज गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महिला आणि बालविकास कल्याण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.


गोदावरीच्या खोऱ्यातून पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी समुद्रात वाहून जाते. ते पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यात आणले जाणार आहे. या संबधीचा प्लान तयार आहे. मराठवाड्यातील सगळी धरणे पाईपने जोडून पिण्याचे पाणी प्रत्येक ठिकाणी पोहचवण्याची वॉटर ग्रीड योजनेला मंजुरी दिली आहे. इस्राईलसोबत करार करून हे काम केलं जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलं होतं. बीड जिल्ह्यामध्ये कृष्णाखोऱ्याचं पाणी आलं पाहिजे, हे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं. त्यामुळे मराठवाड्याच्या वाट्याचं 7 टीएमसी पाणी देण्याच्या प्रकल्पाला आपण मान्यता दिली आहे. लवकरच हे पाणी बीड जिल्ह्यात पोहोचेल आणि मुंडे साहेबांचं स्वप्न साकार केल्याचा आज आनंद झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.


मुंडे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी मुंडे साहेबांचा राजकारणाचा वारसा जपला. लोकांसाठी काम करणे त्यांनी सुरु ठेवलं. काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे गोपीनाथ मुंडे यांचं नाव का लावतात? अशा लोकांना उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, गोपीनाथ मुंडे यांच नाव पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे लावणार नाहीत तर काय तुमच्या सारखे करंटे लावणार का? तसेच गोपीनाथ मुंडे यांचं नेतृत्व ज्यांना मान्य केलं, त्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचं नाव लावण्याचा अधिकार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.