सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची महाजनादेश यात्रा पुन्हा सुरु होणार आहे. या यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून सुरु होणार असून ही यात्रा 31 ऑगस्टपर्यंत राज्यात 1,839 किमी प्रवास करणार आहे. 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरु राहील. या यात्रेची सुरुवात नंदुरबार येथून होणार आहे तर समारोप 31 ऑगस्टला सोलापूर येथे होणार आहे.


राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे जनादेश यात्रा पाच दिवस उशिरा नंदुरबार येथून यात्रा सुरू होईल.  महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्हे आणि 55 मतदारसंघ आहेत. यामध्ये 39 जाहीर सभा होणार आहेत तर 50 स्वागत सभा होणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा 1839 किमी प्रवास करणार आहे. दुसऱ्या टप्प्याचा समारोप 31 ऑगस्टला सोलापूर येथे होणार आहे.

महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा गणेशोत्सव संपल्यावर सुरु होणार असल्याची माहिती भाजप नेते आणि महाजनादेश यात्रा प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.

सांगली, कोल्हापूर येथील पूर परिस्थितीमुळे 3 दिवस आधीच पहिला टप्पा बंद झाला होता. पूरग्रस्त भाग असलेले पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे जिल्हे महाजनादेश यात्रेतून वगळले होते.

यात्रेतील सर्व निवास व्यवस्था एकाच जागी करण्यात आली आहे. मार्गावरील सर्व गावात स्वागत आयोजित करण्याचे प्रयत्न आहेत. मुख्यमंत्री रथावरूनचं स्वागत स्विकारतील. यात्रेत तीन हजारांपेक्षा अधिक नागरिक आले तर रथावरूनचं मुख्यमंत्री लोकांना मार्गदर्शन करतील, अशी माहितीही ठाकूर यांनी दिली.