मुंबई : पालघर आणि भंडारा-गोंदियामध्ये झालेल्या ईव्हीएम बिघाडाचा सर्वाधिक फटका भाजपलाच झाला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे जिंकल्यानंतर ईव्हीएमचा दोष नाही आणि हरल्यानंतर ईव्हीएमचा दोष, ही सवय विरोधकांनी सोडून द्यावी, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.


मित्रपक्षांनी एकमेकांविरोधात लढणं हे अयोग्य असल्याचं मत व्यक्त करुन, शिवसेनेनं युतीसाठी आता एक पाऊल पुढे येण्याची गरज असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. आज पालघ पोटनिवडणुकीतल्या विजयाचं औचित्य साधून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

“पालघरमधील विजयामुळे आम्हला आंनद आहे. मात्र ही निवडणूक क्लेशदायक देखील होती. अतिशय कडवट अशी निवडणूक होती, जी टाळता आली असती. आमच्याकडून कडवटपणा संपला असून, वनगा यांच्या कुटुंबीयांना आमचे दरवाजे नेहमी खुले राहतील.”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सरकारमध्ये असलेल्या दोन पक्षांनी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी, ही विचार करण्याची गोष्ट आहे, अशी खंतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

भंडारा-गोंदियातील पराभव आम्ही मान्य करतो, जर पावसाळ्यानंतर निवडणूक झाली असती तर निकाल वेगळा असता, असे म्हणत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मधुभाऊंचे अभिनंदन, मात्र काही महिन्यानंतर त्यांना तिकीट मिळणार नाही आणि तिथे तेव्हा भजपच निवडून येईल.”