शिवरायांचे आशीर्वाद, सरकारवरील विश्वासामुळे यश : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 28 Nov 2016 08:35 PM (IST)
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आणि केंद्र तसंच राज्य सरकारच्या विकास कामांवर जनतेने दाखवलेला सार्थ विश्वास यामुळेच नगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करु शकलो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 'राज्यासमोर अनेक आव्हानं होती. मात्र ते सोडवण्यासाठी राज्य सरकार ज्या योजना आखते आहे, जे उपाय करते, त्यावर राज्यातील जनतेने व्यक्त केलेले हे समाधान आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.' अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारसुद्धा गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी अनेक योजना राबवत आहे. त्यावर मतदारांनी अतिशय भरभरुन यश आम्हाला दिलं, याचा निश्चितच आनंद आहे. या यशात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आपल्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, पदाधिकारी आणि सर्वांत महत्त्वाचे कार्यकर्त्यांचे श्रेय अधिक आहे. या सर्वांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.