मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आणि केंद्र तसंच राज्य सरकारच्या विकास कामांवर जनतेने दाखवलेला सार्थ विश्वास यामुळेच नगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करु शकलो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


'राज्यासमोर अनेक आव्हानं होती. मात्र ते सोडवण्यासाठी राज्य सरकार ज्या योजना आखते आहे, जे उपाय करते, त्यावर राज्यातील जनतेने व्यक्त केलेले हे समाधान आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.' अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारसुद्धा गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी अनेक योजना राबवत आहे. त्यावर मतदारांनी अतिशय भरभरुन यश आम्हाला दिलं, याचा निश्चितच आनंद आहे. या यशात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आपल्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, पदाधिकारी आणि सर्वांत महत्त्वाचे कार्यकर्त्यांचे श्रेय अधिक आहे. या सर्वांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधानांकडून महाराष्ट्र भाजपचं अभिनंदन, जनतेचे आभार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. ‘महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांमध्ये जनतेने भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. गोरगरीब जनता आणि भाजपच्या विकासाच्या राजकारणाचा हा विजय आहे.’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर म्हटलं आहे.

तब्बल 22 नगरपालिका जिंकून भाजपनं मिनी विधानसभेत आघाडी घेतली आहे. सोबतच 55 ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत. त्यामुळे नगरपालिकेसाठी भाजपने आखलेली रणनीती पूर्णपणे यशस्वी झाल्याचं मानलं जात आहे.