Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील केकत जळगाव येथील शाळेत विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा 257 वर गेला आहे.  पूरक आहारात दिलेली सुट्टी बिस्किटे खाल्ल्याने विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी मळमळ, उलट्या होऊ लागल्या. यातील अडीचशे विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यातील सात विद्यार्थ्यांवरती प्राथमिक उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी या विद्यार्थ्यांचे प्रकृती आणखीनच खालावल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. 

Continues below advertisement

पूरक आहारात वाटण्यात आलेल्या बिस्कीटांमुळे विषबाधा

पैठणच्या केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळा इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत आहे.  या शाळेत 286 विद्यार्थी शिक्षण घेत असून शनिवारी अर्धी शाळा असल्याने सकाळी पूरक आहार म्हणून सुट्टी बिस्किटे देण्यात आली. बिस्किटे खाताच विद्यार्थ्यांना पोट दुखून मळमळ व उलट्या होऊ लागल्या. शाळेत हजर असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना एका मागे एकच त्रास होऊ लागल्याने तातडीने  पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. 

विषबाधा झाल्याची खबर मिळताच विद्यार्थ्यांचे पालक तसेच गावकऱ्यांनी शाळेत धाव घेत विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने दवाखान्यात दाखल करण्यास सुरुवात केली. त्यातील अडीचशे विद्यार्थ्यांना शनिवारी डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र रविवारी सकाळी त्यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती आणखीनच खालवल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. 

Continues below advertisement

सात विद्यार्थ्यांची प्रकृती सौम्य ते गंभीर स्वरूपाची 

केकत जळगाव येथील जिल्हा परिषदेतील 253 विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांची प्रकृती सौम्य ते गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगरचा सिविल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं आहे. 

अभिषेक अनिल दराडे, सायमा सलीम शेख, सत्यम रवींद्र सानप, प्रीती शरद मगर, प्रियंका गणेश मगर, अफवान कलीम शेख, तनवीर मन्सूर शेख या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आलंय.

बिस्कीटांची मुदत तपासली होती का?

जिल्हा परिषद शाळेतील बिस्किटांमुळे विषबाधा झाल्याचे उघड झाल्याने विद्यार्थ्यांचे पालक संतापले आहेत. शाळेत दिल्या जाणाऱ्या खाद्यामधून विषबाधा होण्याचे प्रकार अलीकडे वाढल्याचं दिसत असताना पालकांमध्ये घबराट पसरू लागली आहे. विद्यार्थ्यांना बिस्किट देण्याआधी त्याची मुदत तपासली गेली होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! जि.प शाळेतील 50हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा; मळमळ उलट्या, विद्यार्थी तापाने फणफणले