Chhatrapati Sambhaji Nagar News : गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे डाळिंब (Pomegranate) बागायतदारांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागला होता. डाळिंब बागायतदार या संकटातून बाहेर पडत नाही तो, आता त्यांच्यासमोर आणखी नवीन संकट उभं राहिले आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) तालुक्यातील करमाड येथील उपबाजारपेठेत बुधवारी डाळिंबाच्या 20 किलोच्या कॅरेटला 5 हजार 100 रुपयांचा दर मिळाला असताना, गुरूवारी रात्री लाडसावंगी शिवारातील शेतातील बागेतून डाळिबांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे डाळिंब बागायतदार यांची चिंता वाढली आहे. 


संभाजीनगरच्या लाडसावंगी परिसरातील मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड करण्यात आल्याचे पाहायला मिळते. तर येथील शेतकरी यशवंत बबन पडूळ यांनी सुद्धा आपल्या दोन एकरवर डाळिंबाची बाग लावली आहे. सध्या हे डाळिंब विक्रीसाठी आले होते. मात्र शुक्रवारी सकाळी 7 वाजता ते शेवटची कीटकनाशक फवारणी करण्यासाठी बागेत गेले असता, त्यांना बऱ्याच झाडावरचे डाळिंब तोडलेले दिसून आले. पाऊस पडलेला असल्याने बागेत पाऊल खुणा व रस्त्यावर डाळिंब पडलेले त्यांना दिसले. त्यामुळे गुरूवारी रात्री त्यांच्या शेतातून डाळिंबाची चोरी झाल्याचे समोर आले. तर शुक्रवारी करमाड पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे डाळिंबाचे दर वाढल्यानंतर गेल्यावर्षी सुद्धा करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नायगव्हाण व लामकाना येथील बागेतून डाळिंबाची चोरी झाली होती. त्यावेळी पोलिसांनी चोरांना पकडले होते. आता या प्रकरणातही चोरट्यांना पकडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


बाजारात दर वाढल्याने चोरीचे प्रकार...


करमाड आणि परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी छत्रपती संभाजीनगर येथील खुल्या बाजारात तसेच छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या करमाड येथील उपबाजारपेठेत डाळिंबाची विक्री करतात. बुधवारी सकाळी पहिल्या लिलावात करमाड येथील उपबाजारपेठेत डाळिंबाच्या 20 किलोच्या कॅरेटला 5 हजार 100 रुपयांचा दर मिळला. चांगला भाव मिळत असल्याने एकिकडे शेतकरी समाधानी असताना दुसरीकडे लाडसावंगी परिसरातील डाळिंबाच्या बागेतून डाळिंबाची चोरी होऊ लागली आहे. त्यामुळे याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे अशा चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 


शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली? 


अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना देखील नुकसानीचा सामना करावा लागला होता. मात्र अशात संभाजीनगरमध्ये डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण आता शेतातूनच डाळिंबाची चोरीचे प्रकार समोर येत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. तर रात्रीचा मुक्काम शेतात करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशात आता पोलिसांनी डाळिंब चोरांना पकडण्याची मागणी केली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Heavy Rains in Marathwada : मराठवाड्यातील 67 मंडळांत दमदार पावसाची हजेरी, विभागातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी