Chhagan Bhujbal :  संसदीय सदस्य संख्येवर निर्णय घ्यायचा होता तर प्रतिज्ञापत्र कशासाठी मागवली? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. आता खरा निर्णय जनतेच्या कोर्टात असून सहानुभूती ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे असं मत छगन भुजबळ यांनी दिली आहे.


निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा पक्ष बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला शिवसेना हे नाव व पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे. या निकाला नंतर नाशिक येथे छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. त्यात वेगवेगळे कंगोरे आहे. यात सखोल विचार करण्याचे काम सुप्रीम कोर्ट करत आहे. त्याच्यात निवडणूक आयोग यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. त्यासाठी प्रतिज्ञापत्र ठाकरे गटाने सादर केली. आता त्यांनी निर्णय दिला की, संसदीय पक्षात जास्तीत जास्त खासदार आणि आमदार शिंदे गटाकडे आहे. जर याच्यावर निर्णय द्यायचा होता तर पदाधिकारी यांचे प्रतिज्ञापत्र का मागवले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


छगन भुजबळ पुढे म्हणाले की, असा निर्णय येईल असा संशय उद्धव ठाकरे यांना होता. यामुळे त्यांनी सांगितलं होतं की, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. मात्र निवडणूक आयोगाकडून निर्णय घोषित करण्यात आला. खरतर त्यांनी दोन चार दिवस थांबायला काय हरकत होती? असेही त्यांनी सांगितले.


ते म्हणाले की, देशात असे जर निर्णय लागत असतील तर पुढे अनेक प्रश्न निर्माण होतील. ही मोठी विचित्र परिस्थिती लोकशाहीत निर्माण होऊ शकते. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी  ही शिवसेनेची चळवळ सुरू केली. त्यांनी पक्ष स्थापन केला. स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पुढे नेली. त्यानंतर पुढचे पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे असतील, असा निर्णय झाला. आता अचानक असे निर्णय आले. याला सुद्धा उद्घव ठाकरे सुप्रीम कोर्टात आव्हान देत शकतील असे त्यांनी सांगितले.


खरा निर्णय जनतेच्या कोर्टात...


निवडणूक आयोग हे निष्पक्षपणे निर्णय घेतात. देशातील केंद्रीय संस्था यांच्याबाबत नक्की काय आहे, हे जनतेला माहित आहे. त्यामुळे असं होणार, हे लोकांना माहित होतं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या गटाला एक जोड शब्द देऊन ते शिवसेना म्हणून राहतील. राहिला प्रश्न तो निशाणीचा तर आता समाज माध्यमांवर एक मिनिटांत निशाणी आणि नाव ताबोडतोब जाईल. यात फार काही गोंधळ उडणार नाही. फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायचं की एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायचं, हे मतदारांना ठरवायचं आहे. पण खरा निर्णय जनतेच्या कोर्टात आहे. याची सहानुभूती ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे, असं माझं मत आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.