मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जुलैमध्ये नियोजित केलेल्या विद्यापीठ महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात याव्यात, याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यूजीसीला परवानगीसाठी पत्र लिहलं असल्याची माहिती आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सद्यस्थितीत कोरोनाचा दिवसेंदिवस राज्यात वाढणारा संसर्ग आणि वाढत चाललेला लॉकडाऊन यामध्ये या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून आपण या परीक्षा घेणं शक्य नसल्याचं उदय सामंत यांनी या यूजीसीला लिहिलेल्या पत्रात कळवलं आहे


याआधी यूजीसीच्या मार्गदर्शकतत्वानुसार राज्यात इतर सर्व विद्यापीठ महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सोडून इतर सर्व पदवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून उच्च व तंत्रशिक्षण विभाग याबाबत पुढील निर्णय कळवणार होता. याशिवाय परीक्षा रद्द कराव्यात म्हणून युवासेनेकडून सुद्धा यूजीसीला पत्र देण्यात आले होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांची बाजू विचारात घेत या देखील रद्द कराव्यात, अशी मागणी केली होती. त्यामुळे मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करुन हे पत्र पाठवत असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.


कोरोनाच्या वाढत्या संकटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी विचार करून त्यांच्या मनावरील ताण बघून या परीक्षा घेता येणं या स्थितीत शक्य नसल्याचं उदय सामंत म्हणाले. यासोबतच या परीक्षा घेणं शक्य जरी नसलं तरी विद्यार्थ्याचा कोणताही नुकसान यामध्ये होणार नसून योग्य ती ग्रेडेशन पद्धतीने या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे यूजीसीने ग्रेडेशन पद्धतीद्वारे यावर्षी या परीक्षाचा निकाल देण्याबाबत सूचना निर्गमित कराव्यात, असं या पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे यूजीसी याबाबत विचार करेल आणि त्या पलीकडे शासन म्हणून काही कठोर निर्णय जर आम्हला घ्यावे लागले तर विद्यापीठांचे कुलगुरू, मुख्य सचिव, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून येत्या दोन दिवसात जाहीर करणार असल्याचं उदय सामंत म्हणाले.


सीईटी परीक्षा बाबत


सीईटी परीक्षा देखील यावर्षी घेणं आवश्यक असताना पदवीसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 4, 6, 7, 8, 9, 10, 13, 14, 28, 29, 30, 31 जुलैला सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये जे विद्यार्थी परीक्षा जर देऊन शकले नाहीत, तर 3, 4 आणि 5 ऑगस्टला विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात येतील. त्यात सुद्धा त्यावेळची कोरोनाच्या स्थितीचा विचार केला जाणार आहे. जिल्ह्याच्या स्तरावर घेतली जाणारी सीईटी परीक्षा ही आता यावर्षी तालुकाच्या स्तरावर घेतली जाणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळले जातील. इतकाच नाही तर या परीक्षेसाठी जर विद्यार्थी शिक्षणाला एका ठिकाणी आणि घर एका ठिकाणी असेल तर त्याला सेंटर बदलण्याची मुभा सुद्धा विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेदरम्यान दिली जाणार आहे. इतर सीईटी परीक्षाबाबत सुद्धा लवकर निर्णय घेतला जाणार आहे.


University Exams | अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नका, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता राज्य सरकारचं यूजीसीला पत्र




Education Loan Information:

Calculate Education Loan EMI