लोणार पाणी पातळी वाढ प्रकरण! यापूर्वी पाऊस कधीच झाला नव्हता का? विश्वास बसेल असे कारण सांगा, न्यायालयाचे सरकारला खडे बोल
लोणार सरोवरातील पाण्याच्या वाढणाऱ्या पातळीचे प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
Buldhana Lonar Lake : जगविख्यात लोणार सरोवरातील पाण्याच्या वाढणाऱ्या पातळीचे प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. अशा प्रकारचा पाऊस यापूर्वी कधीच झाला नव्हता काय? विश्वास बसेल असे कारण सांगा असे न्यायालयाने सरकारला म्हटले आहे. लोणार सरोवराच्या पामी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याचा "एबीपी माझा" ने पाठपुरावा केला होता.
उल्कापातामुळे पडलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवरात गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने जल पातळी वाढत आहे. यामुळे लोणार सरोवरातील 12 व्या शतकातील अनेक प्राचीन हिंदू मंदिरे पाण्यात बुडाली आहेत इतकच काय तर अशा प्रकारे पाण्याची पातळी वाढत राहिली तर या मंदिरांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे. शिवाय सरोवराची जैवविविधता ही धोक्यात आली आहे. सरोवरातील पाण्याचे गुणधर्म बदलल्याने लाखो वर्षांच्या इतिहासात प्रथमच या पाण्यात मासेही आढळले आहेत. याचं वास्तव "एबीपी माझा" ने उघड केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेत स्वतःहून याबद्दल जनहित याचिका दाखल करून घेतली.
सरोवरातील वाढत्या जल पातळीचे कारणे शासनाकडे विचारण्यात आली
काल या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सरोवरातील वाढत्या जल पातळीचे कारणे शासनाकडे विचारण्यात आली. त्यावर शासनाने " यंदा लोणार परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जलस्तर वाढल्याचे कारण मांडलं. " मात्र न्यायालयाने या स्पष्टीकरणावर आश्चर्य व्यक्त करत " विश्वास बसेल असे किमान कारण सांगा..! अशा प्रकारचा पाऊस यापूर्वी कधीच झाला नव्हता काय..? " असा प्रति प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला व शासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने न्यायालयाने जल पातळी वाढीमागील नेमके कारणे शोधून काढण्याचे निर्देश दिले आहेत. यापुढील सुनावणी दिनांक 4 मार्च रोजी ठेवण्यात आलेली आहे. अद्यापही जिल्हा प्रशासनाने वाढत्या जल पातळीवर कुठलीही कारवाई केलेली नाही त्यामुळे गेल्याच आठवड्यात लोणार येथे मोठा आंदोलनही नागरिकांकडून करण्यात आलं होतं.
गेल्या काही महिन्यांपासून सरोवरातील पाण्याचे चार स्रोत अखंड वाहतायेत
गेल्या काही महिन्यांपासून सरोवरातील पाण्याचे चार स्रोत अखंड वाहत असल्याने पाण्याची पातळी सतत वाढत आहे. परिणामी, आसपासच्या जैवविविधतेचे अस्तित्व मिटण्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. असे असताना यासंदर्भात योग्य शास्त्रीय संशोधन झाले नाही. गतवर्षी पावसाळ्यात सरोवरातील पाण्याची पातळी वाढली.

























