बुलडाणा : सततची नापिकी आणि दुष्काळामुळे बुलडाण्यातील एका शेतकरी महिलेने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चिखली तालुक्यातील धोत्राभांगोजी या गावातील आशाबाई दिलीप इंगळे यांनी 14 नोव्हेंबरच्या रात्री गायीच्या गोठ्यात लाकडं रचून त्यावर पांघरुण टाकून सरण रचलं आणि स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला.


आशाबाई इंगळे यांनी 14 नोव्हेंबरच्या रात्री मुलांना काही न सांगता गोठ्यात जाऊन स्वतःचं सरण रचून त्यात उडी घेतली आणि आपली जीवनयात्रा संपवली. मात्र ही बाब शेजाऱ्यांना समजताच त्यांनी आशाबाईंना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही.

मृत शेतकरी महिला आशाबाई इंगळे यांच्याकडे साडेतीन एकर शेती असून त्यांना दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले रोजंदारीने कामावर जातात, तर एका मुलीचं लग्न झालं आहे. त्यांचे पती दिलीपराव इंगळे यांचं 2008 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. पतीनंतर मोठ्या हिंमतीने त्यांनी आपल्या संसाराचा गाडा पुढे रेटला.

पण शेतात सातत्याने अत्यल्प उत्पन्न येत असल्याने त्या आर्थिक कोंडीत सापडल्या होत्या. त्यातच त्यांच्यावर जिल्हा सहकारी बँकेचे 80 हजार रुपयांचं कर्ज तसंच खाजगी देणे बाकी होते. यावर्षी सोयाबीनचे उत्पन्न कमी झाल्याने त्यातून काही देण्याचे पैसे चुकते केले. मात्र परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याचं वाटल्याने त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं, असं नातेवाईक सांगतात. दरम्यान याप्रकरणी अमरापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.