रत्नागिरी : क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती आल्यामुळे साकव (पूल) कोसळून अनेक जण नदीपात्रात पडले. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामधल्या संगमेश्वर तालुक्यातील मौजे कळंबुशी-खाचरवाडी येथे गावच्या शिमग्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नसली, तरी अनेक जण जखमी झाले आहेत.


साकव कोसळतानाचा व्हिडिओ चित्रित झाला आहे. संगमेश्वरच्या कळंबुशी-खाचरवाडी देवीचा माड घेऊन सर्व ग्रामस्थ होळी उभारण्यासाठी निघाले होते. ग्रामस्थ ही होळी घेऊन पुलावर आले असता 35 वर्षे जुना साकव कोसळला.

साकव कोसळताच एकच धावाधाव झाली. होळी सहित अनेक ग्रामस्थ पाणी नसलेल्या नदीच्या पात्रात एकमेकांच्या अंगावर कोसळले. यात 11 जण गंभीर जखमी झाले असून काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना डेरवण च्या वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. कोकणातील अनेक गावात असे जीर्ण झालेले पण वापरात असलेले अनेक जुने साकव धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे या मोडकळीस आलेल्या साकवांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.