मुंबई : सत्ताधारी पक्षाकडून आता ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) धमक्या देणं बंद झालं आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांना राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जात आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद बोलावली होती, यावेळी ते बोलत होते.


काल (01 नोव्हेंबर) एबीपी माझाशी बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभर विविध चर्चांना उधाण आले आहे. मुनगंटीवार यांच्या याच वक्तव्याचा संजय राऊत यांनी आज खरपूस समाचार घेतला.

राऊत म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडून आता ईडीच्या धमक्या दिल्या जाणं बंद झाल्या आहेत. आता ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देतात. नवनिर्वाचित आमदारांना सांगितलं जात आहे की, लवकरात लवकर सत्तास्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, अशा धमक्या देऊन नवनिर्वाचित आमदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लहान पक्षाचे आमदार आणि अपक्ष आमदारांना लक्ष्य केलं जात आहे.

संजय राऊत म्हणाले की, कोणत्याही मार्गाने भाजपला फोडाफोडीचं राजकारण जमेना. अगदी ईडीची धमकी देऊनही आमदार फुटत नाहीत, ही गोष्ट लक्षात आल्यामुळे अंतिम पर्याय म्हणून आमदारांना राष्ट्रपती राजवट लागू होईल, अशी धमकी दिली जात आहे.

पाहा काय म्हणाले संजय राऊत?



राष्ट्रपती राजवटीची धमकी?



मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शिवसेना खासदार संजय राऊतांचा पुनरुच्चार | मुंबई | ABP Majha