अकोला : भाजप खासदार नाना पटोलेंनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर हल्लाबोल केला आहे. इतकंच नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, असं सांगत पटोलेंनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले आहेत.


राज्य सरकारनं सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस पावलं उचलावी अन्यथा आपण इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले. पटोले यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता.

कुणाच्या खुर्चीवर असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडता येत नसतील, तर ती खुर्चीच परत देऊ असं म्हणत पटोले यांनी पुढचे संकेत दिले.

मोदी सरकार हे अंबानी आणि अदानी यांची घरं भरण्याचं काम करत असल्याचा सनसनाटी आरोप पटोले यांनी केला. नाना पटोले हे गोंदिया-भंडारामधून भाजपचे खासदार आहेत. अकोल्यातील खंडेलवाल भवन येथे शेतकरी जागर मंचानं आयोजित शेतकरी संवाद सभेत ते बोलत होते.

फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले


विधानसभेतील अधिकृत रेकॉर्ड काढून पाहा, महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार शिवसेनेच्या पाठिंब्यावर नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा काढला तरी, फडणवीस सरकारला काहीही फरक पडणार नाही”, असं  नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात 'माझा कट्टा'वर सांगितलं होतं.