मुंबई : राज्यातील काही भागात विशेषत: मराठवाड्यात झालेल्या पावसामुळं शेतकरी अडचणीत सापडला आहे. यानंतर राजकीय नेत्यांचे दौरे सुरु झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावरुन शिवसेनेनं त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या टीकेला फडणवीस यांनी लातूरमध्ये उत्तर दिलं आहे. जे लोक ऑफिसमध्ये बसून टीका करतात अग्रलेख लिहून नेते होतात त्यांना शेतकऱ्यांचा दुःख काय माहीत. हे ऑफिसमधले लीडर आहेत, हे कागदावरचे लीडर आहेत त्यांना काय उत्तर द्यायचं, अशा शब्दात फडणवीसांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. 


फडणवीसांचा पूरग्रस्त भागाचा दौरा 'व्हाया ओला दुष्काळ' राजकारण, शिवसेनेची टीका


सरकारकडून विदर्भ मराठवाड्यावर अन्याय 
फडणवीस म्हणाले की, हे सरकार मराठवाडा विरोधी आहे. पूरग्रस्त भागाचा दौरा मुख्यमंत्र्यांना करायचा असेल तर आताच करावा अन्यथा मुंबईतून मदतीची घोषणा करावी.  मुख्यमंत्री सोडा पालकमंत्री देखील दौऱ्यावर गेलेले नाहीत.  सरकारकडून विदर्भ मराठवाड्यावर अन्याय होतोय. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. धरणातून तेरा टीएमसी पाणी सोडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि लोकांच्या शेतामध्ये पाणी गेलं आहे. हजारो एकर शेतीचे नुकसान झालं याची चौकशी झाली पाहिजे. पाणी किती वेगाने सोडलं पाहिजे कसं सोडलं पाहिजे यासंदर्भात SOP तयार झाली पाहिजे.  सरकार शेतकऱ्याला न्याय देणार नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 


सरकारमध्ये संवेदना उरली नाही
फडणवीस म्हणाले की,  मुख्यमंत्री तर सोडाच पण पालकमंत्रीही मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात आले नाहीत.  मुख्यमंत्र्यांना दौरा करायचा असेल तर त्यांनी तात्काळ करावा.  मुख्यमंत्र्यांना यायचं असेल तर येऊ नये पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्यावे.  या सरकारमध्ये संवेदना उरली नाही. पालकमंत्री सुद्धा जिल्ह्यामध्ये येत नाहीत. या सरकारला वैधानिक विकास मंडळाची हत्या केली.  मुख्यमंत्री कोकणात जात असतील पश्चिम महाराष्ट्रात जात असतील तर ते मराठवाड्यात का येत नाहीत असा सवाल आहे, असं ते म्हणाले. सरकारनं कागदावरचं पॅकेज नाही तर ते शेतकऱ्यांसाठी पॅकेज घोषित करावं, असं ते म्हणाले. 


 सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांवर टीका
शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांवर टीका करताना म्हटलं आहे की, मराठवाड्यातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणाऱ्या फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक 'मुखवटा' होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा 'चेहरा' होता का? फडणवीस यांचा पूरग्रस्त भागाचा दौराही अखेर 'व्हाया ओला दुष्काळ' राजकारण, असाच झाला म्हणायचा, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.  ''आम्हाला आता केवळ तुमच्याकडूनच अपेक्षा आहे,'' असे काही शेतकऱ्यांनी म्हणे फडणवीस व दरेकर यांना सांगितले. याचा अर्थ असा की, केंद्रातल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी ठाकरे सरकारला सढळ हस्ते मदत करावी.  फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागावी व राज्याचे रखडलेले पैसे आपले वजन वापरून घेऊन यावेत. शेतकरी चिंताग्रस्त आहेच. संकट अस्मानी आहे व त्याच्याशी एकजुटीने लढायला हवे. ''आमचा मराठवाडय़ाच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केवळ प्रशासनाला जागे करणे, शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवून प्रशासनाकडून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आहे,'' असे विरोधी पक्षनेते. फडणवीस यांनी जाहीर केले. या त्यांच्या विधायक भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पंतप्रधान मोदी हे विरोधकांकडून नेहमीच विधायक भूमिकेची अपेक्षा करतात. विरोधी पक्ष हे बौद्धिक बेइमानी करीत असून राजकीय फसवेगिरीतही ते आघाडीवर असल्याचे ज्वलंत मत मोदी यांनी नुकतेच मांडले. विरोधकांनी लोकांना फसवू नये व गोंधळ निर्माण करू नये, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. त्याबरहुपूम राज्यातल्या विरोधी पक्षाने वागायचे ठरवले असेल तर त्यात त्यांचे व राज्याचेही हित आहे, असं सामनात म्हटलं आहे.