Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना भाजपसोबत युती हवी होती. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे त्यांना मुख्यमंत्री म्हणून नको होते, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी केलं आहे. चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात आले असताना बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी षडयंत्र झालं असल्याचेही बावनकुळे म्हणाले.


शरद पवारांना भाजप चालतो पण फडणवीस नको 


शरद पवारांना भाजप चालतो. त्यांना भाजपसोबत युती हवी होती पण फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते असं मोठं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे. शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस सोडून कुणीही मुख्यमंत्री आणि कुठलाही पक्ष चालला असता असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर...


देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी षडयंत्र केल्याचे शरद पवार यांनी मान्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी शरद पवार कोणत्याही स्तराला जाऊ शकतात असेही बावनकुळे म्हणाले. भाजप-शिवसेना युती तोडणे, निवडूण आल्यावर उद्धव ठाकरेंना वेगळं करणे हे कशामुळं झालं?  कारण देवेंद्र फडणवीस एकदा मुख्यमंत्री झाले की, महाराष्ट्रात 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळणार नाही. 15 वर्ष महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता असेल ही भीती शरद पवार यांना वाटत होती. म्हणून शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत असे वाटत असल्याचे बावनकुळे म्हणाले. फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून पवारांनी क्लुप्त्या आणि युक्त्या लढवल्याचे बावनकुळे म्हणाले.


दोन्ही जागा भाजपच्या  


जेव्हा जेव्हा निवडूक असते तेव्हा तेव्हा भाजप आणि महायुतीचे नेते प्रचाराला येतात. आमच्या दृष्टीनं दोन्ही ठिकाणच्या म्हणजे कसबा आणि चिंचवड या ठिकाणच्या पोटनिवडणुका महत्वाच्या असल्याचे बावनकुळे म्हणाले. या दोन्ही जागा भाजपच्या असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले. 


Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली


पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट (President Rule ) उठली असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. ते चिंचवडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी सरकार बदलायचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याचा एक फायदा झाला, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली असे पवार म्हणाले. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं ते तुम्ही पाहिलं असेल, असंही पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली; शरद पवारांचं पुण्यात मोठं वक्तव्य