मुंबई : महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्याच तर, आम्हाला लढावंच लागेल. मैदान सोडून तर जाता
येणार नाही, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलं आहे. अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असून पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली.


निवडणुका झाल्याच तर भाजपच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आता आम्ही आमची ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोण किती सीट लढणार हे नंतर, पण प्रत्येक सीटवर ताकद वाढवणार, असंही शाहांनी स्पष्ट केलं.

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधील संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. अशा वेळी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा अनेकदा शिवसेना नेत्यांनी दिला आहे. तसंच मध्यावधी निवडणुकांचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अलिकडेच मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप सज्ज आहे, असं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर अमित शहांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे.

अमित शाहांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

या तीन वर्षात भाजप सरकारनं अनेक कामं केली आहेत. सरकारनं गरीब, महिला, आदिवासी, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना तयार केल्या आणि अंमलबाजवणीही.

तीन वर्षात आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, भाजप सरकार पारदर्शी सरकार.

भारताच्या अर्थव्यवस्थेला दिशा आणि वेग दिला. एक मजबूत सरकार देण्याचं काम भाजपने केलं.

भाजप सरकार संवेदनशील असून देशाची मानसिकता बदलण्याचं काम सरकारनं केलं.

जीएसटीला मूर्त रुप देण्याचं काम या सरकारनं केलं आहे. देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या.

महाराष्ट्रासाठी केंद्राने खूप केलं आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी 1835 कोटी वरुन 6140 कोटी
करण्यात आला.

पहिला 'मेक इन इंडिया' प्रोग्रॅम महाराष्ट्रात.

बाबासाहेब स्मारक, शिवाजी महाराज स्मारक, कोस्टल रोडलाही सहकार्य करत आहेत.

मुंबईत 1 लाख कोटीहून अधिक विकासकामं सुरु, 2100 कोटी मेट्रोला.

भारत-पाकिस्तान मॅच आंतरराष्ट्रीय फोरमवर होत आहे. ते होईलच. पण आपण पाकिस्तानला जात नाही,
ते येत नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे सुरु राहणार.

स्वतंत्र विदर्भाबाबत भूमिका स्पष्ट झाली की सांगू. आम्ही शिवसेनेला समजावू.