Rohit Pawar : भीमाशंकरचे (Bhimashankar) सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा (Aasam CM Himanta Biswa Sarma) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सहावं ज्योतिर्लिंग हे भीमाशंकर नसून ते आसामला असल्याचा दावा करणं आश्चर्यकारक असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. सत्तेसाठी जे आसामला गेले होते, त्यांनी यावर बोललं पाहिजे अशी खोटक टीका देखील रोहित पवारांनी शिंदे गटावर केली.


गुजरातच्या निवडणुकीवेळी फॉक्सकॉन गुजरातला गेलं. कर्नाटकमध्ये निवडणुकीची चर्चा सुरु झाली की सीमाभागाचा प्रश्न पुढे आल्याचे रोहित पवार म्हणाले. मध्य प्रदेशमध्ये काही पोजेक्ट सुरु झाले. ते महाराष्ट्रात येणार होते. राज्यपालांनी काय पराक्रम केले आहेत, ते आपण सर्वांनी पाहिलं असल्याचे रोहित पवार म्हणाले. भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग सहावं नसून ते आसाममध्ये असल्याचा अजब दावा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळं राज्यात बदला घेण्याचा कट आखण्यासाठी गुवाहाटीला जाऊन आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार घेणारे या दाव्याचा कसा 'बदला' घेतात, याची महाराष्ट्र वाट पाहतोय असंही रोहित पवारांनी म्हटलंय.


 






आसामच्या मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं होतं?


देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर. पण आता भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम  सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे.  भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा  यांनी केला आहे. एवढंच नाही तर आसाम पर्यटन विभागानं (Assam Tourism Department Office) यासंदर्भात जाहिरातबाजी देखील केली आहे. याविरोधात आता महाराष्ट्रातील विरोधकांनी आसाम सरकारच्या दाव्यावर जोरदार टीका केली आहे.  


भीमांशकरबाबतचा वाद निरर्थक  :  महंत सुधीरदास पुजारी


नाशिकच्या काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी यांनी भीमांशकरबाबतचा वाद निरर्थक असल्याचे म्हटलं आहे. याआधी परळीबाबतही असा वाद झाला होता. त्याचप्रमाणे, आजपर्यंत आपले उद्योग महाराष्ट्राबाहेर जात होते, आता धार्मिक स्थळेही बाहेर नेण्याचा विचार राजकारणी करत असल्याची टीका महंत सुधीरदास यांनी केली आहे.


आसाम सरकारचा निषेध, भीमाशंकर महाराष्ट्रातच :  तुषार भोसले 


वृत्तपत्रातील जाहिरातीतून वास्तव आणि सत्य बदलत नाही. भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातच आहे. केंद्र सरकारकडे पण हीच नोंद असल्याचे भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी म्हटलं आहे. आसाम सरकारच्या या प्रकाराचा आम्ही निषेधच करु आणि हे प्रकार खपवून घेतलेच जाणार नाहीत. पण ज्या महाविकास आघाडीच्या लोकांनी दोन वर्ष आमच्या देवांना कोंडून ठेवलं आणि मंदिरांवर सगळ्यात जास्त अन्याय केला त्यांनी आज मंदिरांवर बोलणं म्हणजे 'सौ चुहे खा के बिल्ली चली हज' असे असल्याचे भोसले म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर आसाममध्ये असल्याचा आसाम सरकारचा दावा, महाराष्ट्रातल्या नेत्यांचं जाहिरातबाजीवर जोरदार टीकास्त्र