Bhandara : काँग्रेस अन् भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांच्या गृह मतदारसंघातील भीषण वास्तव; भंडारा- चंद्रपूरच्या वैनगंगा नदीपात्रातून ग्रामस्थांचा नावेतून जीवघेणा प्रवास
Bhandara News : देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला, विकासाच्या गप्पा मारल्या गेल्यात. पण, महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वास्तव काही वेगळंचं आहे.

Bhandara News : देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला, विकासाच्या गप्पा मारल्या गेल्यात. पण, महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वास्तव काही वेगळंचं आहे. भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातील ईटान आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कोलारी, ही दोन गावं आजही विकासापासून कित्येक मैल दूर आहेत. स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही इथल्या ग्रामस्थांच्या नशिबी वैनगंगेच्या पात्रातून नावेतून 'जीवघेणा' प्रवास लिहिला गेला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही मतदारसंघ राज्याच्या राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांचे आहेत.
Bhandara News : नाना पटोलेंच्या हाय-प्रोफाईल मतदार संघात ग्रामस्थांचा नावेतून जीवघेणा प्रवास
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेलं ईटान हे गाव आहे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले नाना पटोले (Nana Patole) यांचा गृह मतदारसंघ. तर, नदीच्या पलीकडे असलेलं चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारी गाव हे भाजपाचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया (Bunty Bhangdiya) यांचा मतदारसंघ.
Nana Patole vs Bunty Bhangdiya : राजकीयदृष्ट्या हे दोन्ही वजनदार नेते आहेत, दोघांचे दोन बलाढ्य पक्ष. पण...
राजकीयदृष्ट्या हे दोन्ही वजनदार नेते आहेत, दोघांचे दोन बलाढ्य पक्ष. पण या दोन गावांना जोडणारा साधा रस्ता किंवा पूल मात्र स्वप्नच उरलं आहे. या दोन गावांना जोडणाऱ्या पुलासाठी केंद्र सरकारने निधी दिला होता. मात्र कालांतराने निधी थांबवल्याने या पुलाचे काम थांबलंय आणि नागरिकांना नावेतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय, असं खापर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर फोडला आहे.
सामाजिक जीवन उद्ध्वस्त, गावातील तरुणांची लग्नं होत नसल्यानं अनेक कुटुंब चिंतेत
दरम्यान, रस्त्याअभावी इथलं सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत चाललं आहे. गावातील तरुणांची लग्नं होत नसल्यानं अनेक कुटुंब चिंतेत आहेत. विकासाच्या 'हायवे'वर धावणाऱ्या महाराष्ट्रात, ईटान आणि कोलारीच्या ग्रामस्थांचा प्रश्न प्रशासनाच्या फाईलीत कुठेतरी अडकून पडला आहे. अमृत महोत्सवी वर्षात जिथे देश चंद्रावर पोहोचला आहे, तिथे या दोन गावांना साधं नदी ओलांडण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावावा लागतोय. आता तरी नाना पटोले आणि बंटी भांगडिया हे दोन दिग्गज नेते आपापल्या मतदारसंघातील या सीमावर्ती भागाचा 'वनवास' संपवतील का? हाच प्रश्न विचारला जातोय.
महत्वाच्या बातम्या:
























