Beed News : बीड जिल्हा वासियांच्या दृष्टीनं जवळच असलेल्या परळी बीड नगर रेल्वे मार्गावर उद्या पहिल्यांदाच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावणार आहे. नगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू होत असून याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन प्रणालीद्वारे दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनकुमार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे आणि नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे हे उपस्थित राहणार आहेत. 


नगर परळी रेल्वे मार्गाचे एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. मागील महिन्यांमध्ये या रेल्वेची चाचणी पूर्ण झाली. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले होते .


परळी बीड नगर रेल्वे चा प्रश्न कायम राहिला चर्चेत


नगर बीड परळी रेल्वे मार्ग कायम बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे विशेष म्हणजे यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकासुद्धा या रेल्वे मार्गच्या प्रश्नाभोवती फिरताना पाहायला मिळाल्या आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी नगर बीड परळी रेल्वे मार्ग संदर्भात कायम केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदी विलासराव देशमुख असताना बीडच्या रेल्वेमार्गासाठी अर्धा निधी राज्य सरकार देणार असल्याची घोषणा झाली होती आणि आज पर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या रेल्वे मार्गासाठी भरीव तरतूद झालेली आहे.


अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा असून गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न रखडला होता. रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या. शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या 1995 साली या नगर बीड परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती. मात्र त्यानंतर अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्तीअभावी या मार्गाचे काम रखडले. सद्यस्थितीत हा प्रकल्प तीन हजार कोटी च्या पुढील असून  नगर ते आष्टी साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली आहे.


अशी असेल नगर आष्टी रेल्वे मार्ग


अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान  7 कि.मी.अंतरावर  मार्च 2018 रोजी सात डब्याच्या रेल्वेची चाचणी झाली होती नंतर अहमदनगर - नारायणडोह - सोलापूरवाडी या 15 कि.मी. अंतरावर दि. 25 फेब्रुवारी 2019 रोजी 7 डब्याची रेल्वे चाचणी झाली मात्र नंतर लॉकडाऊनमुळे पुढील काम मंदावले आणि आष्टीपर्यंत कधी रेल्वे चाचणी होणार हा प्रश्न ऐरणीवर आला होता त्यानंतर सोलापूर वाडी ते आष्टी 32 किमी अंतरावर 20 डिसेंबर 2021 रोजी चाचणी घेण्यात आली.


नगर ते आष्टी सहा थांबे


अहमदनगर ते आष्टी 67 किलोमीटर अंतर असून या दरम्यान सदरील रेल्वेगाडी सहा ठिकाणी प्रवाशांची चढ-उतार करणार आहे यामध्ये प्रथम नारायणडोह,लोणी ,सोलापूर वाडी, धानोरा, कडा व आष्टी या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.


आष्टी तालुक्यातील पाच व नगर जिल्ह्यातील एक स्थानकावर लवकरच तिकीट गृह सुरू आहे.त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुलभ होणार आहे.


आष्टीच्या आसपासच्या पाथर्डी जामखेड कर्जत पाटोदा शिरूर बीड इत्यादी तालुक्यातील नागरिकांना पुणे मुंबई व इतर ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तसेच व्यापारी वर्ग यांना मुंबई पुणे दिल्ली इंदोर गुजरात सुरत इत्यादी ठिकाणाहून माल आणण्यास या रेल्वे गाडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे यामुळे उद्योगधंद्यास चालना मिळून रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha