सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान दीड लाख रुपये द्यावेत : बच्चू कडू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Bacchu Kadu on budget : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत ही कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. यावर प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवाभाऊंनी आज कर्जमाफीची घोषणा केली त्यांचे मी आभार मानतो. पण त्यामध्ये काही त्रुटी आहेत. खरं तर पात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे होती असे कडू म्हणाले.
दुष्काळात होरपळलेल्या चालू कर्जदारांची कर्जमाफी झाली पाहिजे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दीड लाख रुपये दिले पाहिजेत असे कडू म्हणाले. आम्ही कर्जमाफीसाठी मुंबईला गेलो तेव्हा आमच्यावर खूप टीका झाली होती. त्या टीकाकारांना आता उत्तर मिळाला आहे. कर्जमाफीची घोषणा सरकारने केली आहे. कर्जमाफी पासून तारखेपासून दूर जाणाऱ्या सरकारला कर्जमाफीची घोषणा करायला आम्ही भाग पाडले. 14 किंवा 15 तारखेला राजू शेट्टी, अजित नवले, महादेव जानकर, रविकांत तुपकर सह सर्व शेतकरी नेत्यांसोबत बैठक घेणार आणि सरकार समोर कसं जायचं याचा विचार करु असेही कडू यावेळी म्हणाले.
कर्जमाफी योजना फसवी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची टीका
कर्जमाफी योजना फसवी आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच.अटी शर्ती घालून दिलेली कर्जमाफी शेतकरी हिताची नाही असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी कर्जमाफी योजनेवर टीका केली. राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची घोषणा केली आहे. मात्र, ही घोषणा फसवी असल्याचे संदीप जगताप म्हणाले. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, अशा घोषणा सरकारने केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अटी शर्ती घालून केवळ 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. ती ही 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची. यामुळं शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच नाही असेही जगताप म्हणाले.
सरसकट कर्जमाफी करणे गरजेचं, शेतकरी कामगार पक्षाची मागणी
राज्य सरकारनं केलेली कर्जमाफी दुर्दैवी असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने म्हंटलं आहे. शेतकऱ्यांनी जनावरे विकून कर्ज फेडलेले आहे, म्हणून सरसकट कर्जमाफी अपेक्षित होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्यामुळं महाराष्ट्राचा मसनवाटा झाला असताना शेतकरी अशा घोषणा करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार असतील तर हे निंदनीय आहे. या कर्जमाफी विरोधात आम्ही शेतकऱ्यांसोबत आंदोलन उभं करणार आहोत. सरकारला द्यायचे असेल तर सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या






















