औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज की जय...छत्रपती संभाजी महाराज की जय... या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज करण्यात आले. 


मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज येथे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे औरंगाबाद येथे आगमन झाले. स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव महसुली विभाग, जिल्हा, तालुका, गाव या नामकरण फलकाचे अनावरण मुख्यमंत्री  शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय...छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषामुळे परिसर दुमदुमला असल्याचे पाहायला मिळाले. 


जलील यांची टीका...


दरम्यान यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. मंत्रीमंडळची बैठक म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरु असलेली ही नौटंकी आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरु असतांना असे आदेश कसे काढले जातात. आता जर सरकार नियम तोडणार असतील तर आम्ही देखील नियम तोडणार आहे. तुम्ही पाहा आता अर्ध्या तासांत आम्ही काय करतो, असा इशारा जलील यांनी दिला आहे.