औरंगाबाद : 'पळवा पळवी' चित्रपटाची आठवण यावी अशी घटना औरंगाबादच्या वैजापूर (Aurangabad Vaijapur Accident) तालुक्यातील करंजखेड येथे घडली. अपघातात बिअरच्या बॉक्सने भरलेला कंटेनर पलटी झाला.. आणि अवघ्या काही तासात लोकांनी कंटेनरची कंटेनर रिकामा केला.  याच बिअरच्या बॉक्सच्या पळवापळवीचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत  


वैजापूर तालुक्यातील करंजखेडमध्ये काल रात्री 9 ते साडेनऊच्या दरम्यान बिअरच्या बॉक्सने भरलेला कंटेनर पलटी झाला. यानंतर बिअरच्या बाटल्यांचे बॉक्स पळवण्याची स्पर्धा सुरू झाली.  बिअर  बॉक्स भरलेला कंटेनर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग काय जमेल तेवढ्या बाटल्या, जमेल तेवढे बॉक्स पळवायची स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत कंटेनरचा चालक आणि क्लिनर जखमी झाला याची जाणीवही त्यांना नव्हती. काहींनी गोणी भरून बॉक्स पळवले तर काहींना टू व्हीलर वर बॉक्स वर बॉक्स घेऊन पळवापळवी केली.


जवळपास तास-दीड तास ही पळवापळवी सुरू होती. या कंटेनरमध्ये अठराशे बॉक्स होते. त्यातले तासाभरात सोळाशे पन्नास बॉक्स लोकांनी लंपास केले. काही लोकं याचं मोबाईलमध्ये शूटिंग करत होते. हे पाहताच आपण बॉक्स पळतोय हे लक्षात येऊ नये म्हणून काहींनी आपला शर्ट तोंडावरचा झाकला पण बाटल्या आणि बॉक्स काय सोडले नाहीत.


दारू म्हणजे अनेकांचा जीव की प्राण.सध्या महागाई वाढली आहे आणि त्यात दारूच्या किमतीसुद्धा गगनाला भिडल्या आहेत. त्यात अशा पद्धतीने फुकट मिळत असेल मग मात्र तळीरामांची चांदीच म्हणावी लागेल.  लोकांनी झालेल्या अपघाताचा पुरेपूर उपभोग घेत दारूची लयलूट केली. बिअरचा कंटेनर पलटी होणं म्हणजे तळीरामांसाठी पर्वणीच होती. पण बियरच्या बॉक्स पुढे माणुसली मात्र हरली होती. कारण चालक आणि क्लिनर जखमी असताना देखील लोकांना त्याची जाणीव नव्हती. 


यापूर्वी देखील या रस्त्यावर डिझेलचा टँकर पलटी झाला होता. तेव्हाही लोकांनी जीव धोक्यात टाकून डिझेल गोळा केलं. आता लोकांनी बिअर गोळा केली.