औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रात्री अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. या पावसामुळे ग्रामीण भागात दाणादाण उडाली आहे. जिल्ह्यातील अनेक लहान नद्यांना, ओढ्यांना पूर आला तर पिके आडवी झाली आहेत. या वर्षातला सर्वाधिक मुसळधार पाऊस रात्री झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले. कन्नड तालुक्यातील करंजखेड, चिंचोली, घाटशेन्द्रा भागात पावसाने कहर केला.  अनेक ठिकाणी पाणी शेतात साचले तर गावात देखील पाणी शिरले.


जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक एवढा विसर्ग 
औरंगाबाद पैठण जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडी धरणाच्या 27 दरवाजांपैकी काही दरवाजे दीड फूट काही दोन फूट तर काही दरवाजे चार फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी पात्रानजीक राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याबरोबरच नदीपात्रामध्ये मालमत्ता, चीज वस्तु, वाहने, जनावरे, पाळीव प्राणी, शेती अवजारे इतर साधने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे आणि नदीपात्रात कोणीही जाऊ नये असं आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.


 माजलगाव धरण 100 टक्के भरले 


जायकवाडी धरणाचे सगळे दरवाजे उघडल्यामुळे व कुंडलिका, बिंदुसरा प्रकल्पातून होत असलेल्या विसर्गामुळे माजलगाव धरण 100 टक्के भरले असून प्रकल्पात पाण्याचा वाढता ओघ पहाता माजलगाव धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. माजलगाव धरणाच्या पाच दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू होता मात्र आता अकरा दरवाजे उघडण्यात आलेत.
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात 94 हजार 320 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.


सिंधफना नदी पात्रालगतच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रालगत कोणीही विनाकारण जाऊ नये. याबाबत सर्व नदी लगतच्या गावांमध्ये संबधीत ग्रामयंत्रणेमार्फत अवगत करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.


वसमत तालुक्यातील कुरुंदा मंडळात मध्यरात्री मुसळधार पाऊस


हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा मंडळात मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहिले आहेत. त्याचबरोबर कुरुंदा गावाच्या मध्यभागातून वाहणारी जलेश्वर नदीला देखील पूर आला आहे. ही नदी गावाच्या मध्य भागातून वाहत असल्यामुळे काही प्रमाणात नदी शेजारील असलेल्या परिसरामध्ये कमरेइतके पाणी शिरले होते. मात्र पावसाने पहाटेच्या सुमारास विश्रांती घेतल्यामुळे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.