व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 22 May 2018 04:19 PM (IST)
व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून अहमदनगरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे
अहमदनगर : व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून अहमदनगरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. चैतन्य भोर असं जखमी तरुणाचं नाव असून त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपी सचिन गडाखसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सगळे नगरच्या विखे-पाटील कृषी महाविद्यालयातील पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल जाणार होती. यासाठी त्यांनी एक व्हॉट्सअॅप ग्रुपही तयार केला होता. यावेळी अर्धवट शिक्षण सोडलेल्या सचिनला या ग्रुपमधून काढून टाकण्यात आलं होतं. यावरुनच चैतन्य आणि सचिनमध्ये बराच वादही झाला. अखेर हा वाद मिटविण्यासाठी त्यांनी कॉलेजजवळ भेटायचं ठरलं. यावेळी सचिनच्या सांगण्यावरुन त्याचा मित्र अमोलनं चौघांच्या मदतीनं धारधार हत्यारानं प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.