सातारा : ओबीसीमधून आरक्षण आणि अत्यंत कळीचा मुद्दा असलेल्या सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 16 दिवसांपासून पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपसले आहे. ते आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत असतानाच राज्य सरकारकडून स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देण्यात आले. त्यानंतर जरांगे पाटील यांचे माजी सहकारी अजय बारसकर तसेच संगीता वानखेडे आदींकडून आरोपांवरती आरोप होत राहिल्याने आज निर्णायक भूमिका घेण्याचा इशारा दिला होता.


गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप


आज (25 फेब्रुवारी) त्यांनी अंतरवाली सराटीतून पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. आपला एन्काऊंटर करायचा होता, सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न होता, हे सर्व फडणवीसांचे षड्यंत्र आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सुद्धा लोक यामध्ये सामील आहेत असे आरोपांवरती आरोप त्यांनी केले.  


मी ऐकलं नाही, मी पाहिलं नाही तर मी कशाला उत्तर देऊ


थेट मला मारायचं असेल तर थेट सागर बंगल्यावर येतो, मला मारून टाका, पोलिसांनी गोळ्या घातल्यास घालू द्या अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज नियोजित सातारा दौऱ्यावरती होते. जरांगे पाटील यांनी घेतलेल्या अत्यंत आक्रमक पवित्र्यानंतर  देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. मी ऐकलं नाही,  मी पाहिलं नाही तर मी कशाला उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हाच प्रश्न त्यांना दुसऱ्यांदा विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी कोणतेही उत्तर दिलं नाही.


फडणवीस हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशाने रवाना


दरम्यान, कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेल्या फडणवीस यांनी सातारा दौऱ्यातून तातडीने मुंबईकडे प्रस्थान केलं आहे. फडणवीस हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशाने रवाना झाले आहेत. दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा अत्यंत आक्रमक भूमिका घेत सागर बंगल्यावर जाण्याचा निर्धार केला आहे. मात्र, आंतरवाली सराटीमधील ग्रामस्थ त्यांना विनवणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्यांदा रुग्णालयामध्ये जाऊ, त्यानंतर निर्णय घेता येईल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे मात्र माणूस जरांगे पाटील फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी आक्रमक आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या