Arvind Sawant : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना सोबत घेण्याच्या मुद्यावरुन काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये तीव्र मतभेद झाल्याचं चित्र दिसत आहे. राज ठाकरेंना ( Raj Thackeray) महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या मुद्यावर निर्णय घेण्याचे अधिकार मुळात हर्षवर्धन सपकाळ यांना आहेत का? असा सवाल अरविंद सावंत यांनी केलाय. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

Continues below advertisement


राज ठाकरेंना सोबत घेण्याचा आमचा विचार पक्का : अरविंद सावंत 


राज ठाकरेंना सोबत न घेण्याचा हा काँग्रेसचा विचार असेल.‌ परंतु, राज ठाकरेंना सोबत घेण्याचा आमचा विचार पक्का झाल्याचं खासदार सावंत म्हणालेय.‌ यासंदर्भात दसरा मेळाव्यातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे सोबत एकत्र आलोय हे सोबत राहण्यासाठीच असल्याचं स्पष्ट केल्याचं सावंत म्हणालेत. राज ठाकरेंच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सोडणार का? या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. राज ठाकरेंसोबत शिवसेना जाण्याचा निर्णय पक्का झाल्यास ते म्हणाले. दरम्यान, मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकावरून झालेल्या वादावरून त्यांनी जोरदार टीका केली. प्रबोधनकारांचे पुस्तक फेकणारी आणि सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला करणारी प्रवृत्ती एकच असल्याचं ते म्हणाले. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचं ते म्हणालेत. यातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.


शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल


दरम्यान, उद्या शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या अंतिम सुनावणीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. मुळात या विषयावर सुनावणी ही माजी सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्या कार्यकाळातच होणं अपेक्षित होतंय.‌ चंद्रचूड यांच्या सर्वोच्च न्यायालयातील कार्यकाळावर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. उद्याच्या सुनावणीत निश्चितच आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केलाय.


नेमकं काय म्हणाले होते सपकाळ?


राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेला (MNS) मविआसोबत घेण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट नकार दिला आहे.  काँग्रेस आणि महाविकास आघाडीला (MVA Alliance) नव्या भिडूची गरज नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) म्हणाले. 'एबीपी माझा'शी बोलताना सपकाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मविआचं काय होणार, याची चर्चा आता रंगली आहे.