मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) विरोधात आरोपांची आघाडी उघडली आहे. गडकरींनी केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचा इशारा दमानियांनी दिला. पण दमानियांचे पुढचे टार्गेट हे नितीन गडकरी असतील असं भाकीत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दोन दिवसांपूर्वीच केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडकरी नको आहेत, त्यामुळे दमानियांचे ते टार्गेट असतील असं सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.
Anjali Damania On Nitin Gadkari : अंजली दमानिया काय म्हणाल्या?
अंजली दमानिया यांनी त्यांच्या सोशल मीडियावर म्हटलंय की, उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पोल खोल करायला सुरवात करणार आहे. त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिकाच सुरू करणार आहे.
Sushma Andhare Tweet On Anjali Damania : सुषमा अंधारेंचं भाकीत खरं ठरलं?
दमानिया या फक्त भाजप वगळून इतर सगळ्यांची प्रकरणं हाती घेतात. पण नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नकोसे असलेले नितीन गडकरी हे दमानियांचे पुढचे टार्गेट असल्यास नवल वाटणार नाही असं सुषमा अंधारे म्हणाल्या. सुषमा अंधारेंनी दोन दिवसांपूर्वी हे ट्वीट केलं होतं.
अंजली दमानिया यांचे पती अनीश दमानिया यांची राज्य सरकारची थिंक टँक 'मित्रा' या संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना खोचक सल्ला दिला होता. तसेच सुषमा अंधारेंनीही त्यांना टोला लगावला होता.
Anjali Damania Post : मोठ्या प्रकरणावर काम सुरू, दमानियांची पोस्ट
या दोन्ही नेत्यांच्या टीकेवर बोलताना अंजली दमानिया यांनी एक पोस्ट केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, "मी सध्या एका खूप मोठ्या प्रकरणावर काम करत आहे. त्यामुळे रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी एक आठवडाभर थांबावे. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, पण माझ्याकडे सध्या वेळ खूप कमी आहे."
Nitin Gadkari News : गडकरी पुढचे टार्गेट, अंधारेंचे भाकीत
दमानिया यांच्या या ट्वीटला उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या की, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे. फक्त भाजप वगळून इतर सगळ्यांची प्रकरणे हातात कशी काय येतात या प्रश्नाचं उत्तर नाही आणि हे आमच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. असो, तुमचं पुढचं टार्गेट गडकरी असतील तर आम्हाला फार नवल वाटणार नाही. कारण गडकरी हे तसे मोदी आणि फडणवीस दोघांनाही नकोच आहेत..!
नितीन गडकरींच्या अडचणी वाढणार?
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर सातत्याने आरोप केले जात आहेत. आपल्या मुलांच्या कंपन्यांना फायदा होण्यासाठी गडकरींनी इथेनॉलची सक्ती केल्याचा आरोप केला गेला. हे सर्व आरोप चुकीचे असल्याचं स्पष्टीकरण नितीन गडकरींनी दिलं आहे. आता अंजली दमानिया या विषयावर नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
ही बातमी वाचा :