Anil Deshmukh :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान, यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कधी येणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, अजित पवार हे देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबात आग्रही होते. त्याबाबत बैठकाही झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांची देखील वेगळी बैठक झाली असल्याचा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे. 

शेवटची बैठक जयंत पाटलांच्या घरी पहाटे तीन वाजेपर्यंत झाली होती

आतापर्यंत बारा ते तेरा बैठका झाल्या होत्या. जयंत पाटलांच्या घरी शेवटची बैठक झाली होती. ती रात्री दहा ते पहाटे तीन पर्यंत सुरु होती. यावेळी आठ ते दहा जण होते असेही अनिल देशमुख म्हणाले. त्यानंतर अजितदादा, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांची देखील वेगळी बैठक झाली असल्याचं गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे. सगळं ठरलं होतं काय करायचं, कसं करायचं, कुठे करायचं त्याचबरोबर 12 तारीख देखील जाहीर झाली होती असे अनिल देशमुख म्हणाले. राष्ट्रीय अध्यक्षाचा निर्णय त्यांचा पक्ष ठरवेल असेही अनिल देशमुख म्हणाले. 

पवार साहेबांचं वय बघता त्यांना त्रास न देण्याची अजितदादांची भावना होती

शरद पवारांसोबत शेवटची बैठक झाली होती. बारा बैठकीमध्ये काय चर्चा झाली ही देखील शरद पवारांना सांगितलं होतं. अजितदादांची शेवटची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र झाले पाहिजेत. शरद पवार साहेबांचं वय बघता त्यांना त्रास न देण्याची अजितदादांची भावना होती असेही अनिल देशमुख म्हणाले. अजितदादांची शेवटची इच्छा पूर्ण करावी अशी विनंती देखील यावेळी अनिल देशमुख यांनी केली आहे. अजितदादांची शेवटची भेट बाबा आढावांच्या अंत्यविधीला वेळी झाली होती असेही अनिल देशमुख म्हणाले.  

शपथविधीची इतकी घाई करायची आवश्यकता नव्हती

सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याबाबत बोलताना अनिल देशमुक म्हणाले की, शपथविधीची इतकी घाई करायची आवश्यकता नव्हती. दुखवट्याची वेळ आहे. सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या याचा आनंद आहे. मात्र एवढी घाई गडबड करण्याची गरज नव्हती असे अनिल देशमुख म्हणाले. 

सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या घरी येऊन जाधव कुटुंबियांना सांत्वनपर भेट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

महत्वाच्या बातम्या:

शपथ घेताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, मनावर दुःखाचा डोंगर, नव्या आशेने पुढे चालत राहीन!