सांगली : सांगली शहर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या 'थर्ड डिग्री'त मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे प्रकरणात सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची अखेर बदली करण्यात आली आहे.


दत्तात्रय शिंदे यांची नागपूरच्या राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशक पदी नेमणूक करण्यात आली आहे. शिंदे यांच्या जागी सांगलीच्या पोलीस अधिक्षकपदी सुहैल शर्मा यांना पाचारण करण्यात आलं आहे. तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली काळे यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांना सोलापूर शहरला सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पाठवण्यात आलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी यापुर्वीच पोलीस निरिक्षक युवराज कामटेसह 12 पोलिसांना निलंबित करण्यात आल आहे. युवराज कामटे आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह अंबोलीत नेऊन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
अनिकेतच्या मृत्यूमागे सेक्स रॅकेट असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. विशेष म्हणजे, त्याच्या हत्येसाठी पोलिसांनीच सुपारी घेतली असल्याचा आरोप अनिकेतच्या भावाने केला आहे. पण नक्की काय आहे हे प्रकरण आणि यातील अनिकेतच्या मृत्यूचा घटनाक्रम काय? हे आता समोर येऊ लागलं आहे. अतिशय नाट्यपूर्ण या घटनेत पोलिसांच्या एका पथकाने अनिकेत कोथळेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे.

अनिकेतच्या मृत्यूचा घटनाक्रम

हरभट रोडवरील लकी बॅग हाऊस या दुकानामध्ये एक महिन्यापूर्वीच अनिकेत कोथळे कामाला लागला होता.
• 4 नोव्हेंबर 2017 : अनिकेतला अटक होण्याच्या एक दिवस आधीच बॅग हाऊसच्या मालकासोबत त्याचे भांडण झाले होते, असं त्याच्या भावाचं म्हणणं आहे.
• 5 नोव्हेंबर 2017 : अनिकेतने त्याच्या मित्रासोबत चोरी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याच्यासह त्याचा मित्र अमोल भंडारेला 5 नोव्हेंबर रोजी अटक केली होती.
• 6 नोव्हेंबर 2017 : यानंतर 6 तारखेला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अनिकेतवर थर्ड डिग्री वापरल्याने, त्यातच त्याचा मृत्यू झाला.
• 6 नोव्हेंबर 2017 : अनिकेतच्या मृत्यूनंतर तब्बल दोन तासानंतर म्हणजे, रात्री 11 वाजता मयत अनिकेत आणि अमोलला कोठडीतून बाहेर काढलं.
• 7 नोव्हेंबर 2017 : अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी, पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेने पहाटे 4 पर्यंत सांगली शहरात भटकंती केली.
• 7 नोव्हेंबर 2017 : पहाटे 4 नंतर कामटेने नसरुद्दीन मुल्लाला अनिकेतचा मृतदेह कृष्णा नदीच्या घाटावर नेण्यास सांगितलं.
• 7 नोव्हेंबर 2017 : त्यानुसार पोलीस गाडीत अनिकेतचा मृतदेह आणि अमोल भंडारेला घेऊन नसरुद्दीन मुल्ला घाटावर आला. यावेळी त्यांच्यासोबत 27 व 19 वर्षाचे दोन तरुण होते, अशी माहिती समोर येत आहे.
• 7 नोव्हेंबर 2017 : पण कृष्णा काठावर योग्य जागा मिळाली नसल्याने, आणि सकाळ होण्यास सुरुवात झाल्याने, सांगलीपासून 150 किमी दूर असलेल्या सिंधुदुर्ग जिह्यातील आंबोलीमध्ये अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय कामटेच्या टीमने घेतला.
• 7 नोव्हेंबर 2017 : आंबोलीत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरल्यानंतर, अंकली-हरिपूर रस्त्यावर पोलीस गाडीतून मृतदेह काढून, तो हवालदार अनिल लाडच्या मोटारीत घातला, अशी माहिती तपासातून पुढे येत आहे.
• 7 नोव्हेंबर 2017 : तेथून ते अंकलीत गेले. तेथील पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरलं. आणि पुढे कागल, निपाणीमार्गे चार तासाच्या प्रवासानंतर ते आंबोलीत पोहोचले, अन् तिथेच मृतदेह जाळण्यात आला.
• 7 नोव्हेंबर 2017 : यानंतर सकाळी अनिकेत आणि त्याचा मित्र अमोल भंडारेने पोलीस कोठडीतून पलायन केल्याचा बनाव पोलिसांनी रचला.
• 8 नोव्हेंबर 2017 : पण हा बनाव लगेच समोर आला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास तत्काळ सीआयडीकडे सोपवण्यात आला. तर दुसरीकडे युवराज कामटेसह एकूण पाच पोलिसांना निलंबित करुन, त्यांना अटक करण्यात आली.
• 11 नोव्हेंबर 2017 : आज म्हणजे 11 नोव्हेंबर रोजी ठाणे पोलीस अंमलदार आणि मदतनीसासह एकूण 7 पोलिसांना याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे.
अशाप्रकारे अनिकेतचा मृतदेह घेऊन कामटेचे पथक 14 तास फिरत होतं. या 14 तासामधील बरेच तास त्यांनी सांगलीत घालवले होते. या नाट्यपूर्ण घटनेमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर काळा डाग लागला आहे. हत्येचा बोभाटा टाळण्यासाठी सांगली पोलीस दलातील एका पोलीस पथकाने तरुणाची हत्या, आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नामुळे पोलीस दलाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.