नाशिक : देशभर गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्व 7 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने आज हा निकाल दिला. जिल्हा न्यायाधीश पी. आर. देशमुख यांच्याकडे या प्रकरणाची गेल्या काही महिन्यांपासून नियमित सुनावणी सुरू होती. देशभर गाजलेल्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा मृत्यू झाला आहे.


तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील रामभाऊ पवार, ब्रिजकिशोर तिवारी, विलासचंद्र  जोशी, प्रमोद  डहाके, मोहम्मद सरवार, विलास  मोरे, ज्ञानदेव वारके या सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

देशभर गाजलेल्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्याप्रकरणी 49 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. एकूण 32 हजार कोटींहून अधिकचा हा घोटाळा आहे.  मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी मयत झाला आहे. इतर आरोपी रेल्वे सुरक्षा बलातील अधिकारी आणि कर्मचारी आहेत. भक्कम पुराव्याअभावी या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

देशभर गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्याची 2003 पासून सुनावणी सुरु होती.  या प्रकरणाचा CBI कडे तपास होता. आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी.आर.देशमुख यांनी निकाल देत सर्व 7 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

कोण होता अब्दुल करीम तेलगी 

अब्दुल करीम तेलगी हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर स्टेशन रोड येथील रहिवाशी होता. अब्दुल करीम तेलगीने केलेल्‍या कोट्यवधी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळा उघडकीस आल्यानंतर, संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती.

अब्दुल करीम आणि त्याच्या भावांनी नाशिक येथील प्रिटिंग प्रेसमधील जुनी मशिनरी आणून हा बनावट मुद्रांक व्यवसाय थाटला होता. या व्यवसायाला शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेश येथून छुपे पाठबळ होते. तेलगीने बेळगाव जिल्‍ह्‍यातील खानापूर तालुक्यासह मुंबई, पुणे आदी ठिकाणी या बनावट मुद्रांक विक्रीतून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केली होती.