सोलापूर : तुरीला भाव नसल्यामुळे 10 एकर उभ्या पिकाला आग लावण्याची नामुष्की महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या  बासलेगावच्या शेतकऱ्यावर आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी  शशिकांत बिराजदार यांनी आपल्या शेतातील 10 एकर तुरीच्या पिकाला अक्षरशः आग लावली.


इकडे आडती दर देत नाही तिकडे सरकार हमीदरात विकत घेत नाही. काढणीचा खर्च व अडतीचे खर्च याचा ताळ-मेळ बसत नाही. त्यामुळे  पिकाची काढणी न करता उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. वर्षभर ज्या शेतीची निगा राखली तीच शेती पेटवण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यावर आली.

शशिकांत बिराजदार सधन शेतकरी आहेत. अक्कलकोट तालुक्यातल्या बासलेगावच्या पंचक्रोशीत ते आपल्या प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. खरीप पिकामध्ये दरवर्षी साधारण 150 ते 200 क्विंटल तूर उत्पादन ते घेतात. यावर्षीही त्यांनी आपल्या शेतात 26 एकर तूर पेरल त्यापैकी 16 एकराची रास करून उत्पादनही घेतलं.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी अडतीला पाठवलं. अजूनपर्यंत तूर विकली गेली नाही. 3500 ते 4200 पर्यंत त्यांच्या तुरीला मागणी होती. परंतु शासनाने 5100 रुपये हमी दराने विकत घ्यायचं धोरण जाहीर केल्यामुळे त्यांनी त्याची विक्री केली नाही.

काढणीपासून विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेत होणारा खर्च  याचा कुठेच ताळमेळ लागत नाही याची खात्री पटली आणि आपल्या 10 एकराच्या तूर शेतीला त्यांनी आग लावली.

प्रयोग म्हणून केलेली तूर शेती त्यांच्या अंगलट आली. गेल्यावेळी मिळालेला तुरीचा चांगला भाव पाहून त्यांनी तूर लावली. पण हळूहळू तुरीचे दर कोसळत गेले आणि बिराजदार यांच्यावर  उद्विग्न मनस्थितीतून आपल्याच शेताला आग लावण्याची अगतिकता आली.

ज्या मजुरांनी वर्षभर या तुरीच्या शेतात घाम गाळला, मातीला भिजवलं, फुलवलं त्याचं शेतात त्याच हातांनी आग लावताना मजुरांच्या मनाची अवस्थाही सुन्न करणारी होती.

अक्कलकोट तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगलंच नुकसान सहन करावं लागलंय. हमीभाव देण्याच्या आणि तूर विकत घेण्याच्या शासकीय यंत्रणेवर आता शेतकऱ्यांचा भरोसा उरला नाही. उभ्या पिकांना जाळून टाकताना शेतकऱ्याच्या हृदयाची झालेली अवस्था शब्दात व्यक्त होऊ शकत नाही.

‘अच्छे दिन’ येण्याची स्वप्न दाखवलेलं भाजप सरकार असो कि शेतकऱ्यांचा कळवळा दाखवत विरोधकांनी सुरु केलेली संघर्ष यात्रा असो. शेतकऱ्यांच्या जीवनात सुखाचे दिवस अनु शकले नाहीत हेच वास्तव आहे.  शेतातली उभी पिकं जाळून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असेल तर कृषिप्रधान देशाला नक्कीच शोभणार नाही.