सांगली: पिणाऱ्याकडून घ्यायचा टॅक्स न पिणाऱ्यांकडून घेताना लाज वाटत नाही का, अशा शब्दात पेट्रोल दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला.


विरोधकांची संघर्ष यात्रा आज सांगलीत दाखल झाली. इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

पेट्रोल दरावरुन निशाणा

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील दारु दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे त्यापासून मिळणारा महसूल बुडाला. दारुबंदीमुळे बुडालेल्या महसुलाची तूट भरुन काढण्यासाठी राज्य सरकारनं पेट्रोलवर 3 रुपये अधिभार लावला आहे. त्यामुळे पेट्रोल दरात महाराष्ट्र देशात सर्वात महागडं राज्य आहे.

दारुबंदीचा फटका पेट्रोलला, पेट्रोल 3 रुपयांनी महाग


याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, "दारु पिणाऱ्यांपासून मिळणारा महसूल बुडाला म्हणून त्याचा भार न पिणाऱ्यांनी का उचलायचा? पिणाऱ्याकडून घ्यायचा टॅक्स न पिणाऱ्यांकडून घेताना लाज वाटत नाही का"

सर्व तूर खरेदी करा

कोणत्याच प्रश्नावर भाजप गंभीर नाही. 22 एप्रिलपर्यंतचीच तूर का खरेदी केली जाते, सर्वच तूर 5 हजार 50 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करा, अशी मागणी अजित पवारांनी केली.

"कोणतेही आढेवेढे न घेता सगळी तूर खरेदी केलीच पाहिजे. शेतकरी अडचणीत असताना तातडीने निर्णय घ्या. माहिती घेतो या नावाखाली चालढकल करु नका. मुख्यमंत्र्यांनी फक्त इच्छाशक्ती दाखवायला हवी. सरकारने ऐकले नाही, तर प्रसंगी टोकाची भूमिका घेऊ" असा इशारा अजित पवारांनी दिला.

नीती आयोगाचे सदस्य शेतकरीविरोधी बोलतात यामागे बोलविता धनी कोण? कर्जमाफी आणि वीज दरवाढीबाबत विशेष अधिवेशन घ्या अशीही मागणी अजित पवारांनी केली.

शेतकऱ्यांना नाममात्र दरात वीज मिळायला हवी. आमच्या काळातील घेतल्येल्या निर्णयामुळे महाराष्ट्र विजेच्याबाबतीत स्वयंयपूर्ण झाल्याचा दावा अजित पवारांनी केला.

ऊसाच्या बाबतीत सरकार उदासिन आहे. यामुळं साखर कारखाने, शेतकरी अडचणीत आहेत. सधन भागातील शेतकरीही अडचणीत आहे.  शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या ,नाहीतर राज्याला तुमच्यापासून मुक्त करा, असंही अजित पवार म्हणाले.

राधाकृष्ण विखे-पाटील

यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही सरकारवर तोफ डागली.

"राज्यातील कोणताच घटक सुखी नाही, शेतकरी तर उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यावर उपकार करतोय अशा थाटात सरकार तुरीचा विषय हाताळत आहे.  जय जवान, जय किसान या घोषणेला भाजपने हरताळ फासलाय" असा हल्ला विखेंनी चढवला.

तूर खरेदीच्या मुद्यावरून सरकारने पणन मंत्री आणि कृषीमंत्र्यांची हकालपट्टी करावी आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी विखे पाटलांनी केली.

शिवसेनेचे मंत्री शेतकरी कर्जमाफीवर ढिम्मपणे बसून असतात. खरंच कर्जमाफी हवी असेल तर राजीनामे देऊन या यात्रेत सहभागी व्हावे, अशी ऑफरही त्यांनी दिली.

संबंधित बातम्या

दारुबंदीचा फटका पेट्रोलला, पेट्रोल 3 रुपयांनी महाग