प्रत्येक रविवार अजितदादा आणि बारामती! नगराध्यक्ष सातवांनी दिला आठवणींना उजाळा, आज दादांच्या जागी पार्थ पवार उभे
बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन सदाशिव सातव यांनी देखील अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Ajit Pawar plane crash : राज्याचे दिंवगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात 28 जानेवारीला निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत. आजही त्यांचे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या आठवणी सांगत आहेत. बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन सदाशिव सातव यांनी देखील अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्रत्येक रविवारी अजित पवार यांचा बारामती दौरा असायचा, याच संदर्भात नितीन सातव यांनी अजितदादांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
बारामतीत एक काळ असा होता की, रविवार म्हटलं की एक चित्र डोळ्यांसमोर उभं राहायचं रस्त्यांवर गाड्यांची लगबग, अधिकारी सज्ज, कामांच्या ठिकाणी सुरू असलेली धावपळ… कारण तो दिवस असायचा अजित पवार यांच्या विकासकामांच्या पाहणी दौऱ्याचा. तो फक्त एक दौरा नसायचा; तो बारामतीच्या भविष्याचा धांडोळा असायचा असे सातव यांनी म्हटलं आहे.
अजितदादांच्या कडक शिस्तीमागे एकच भावना असायची बारामतीवरचं निस्सीम प्रेम
दादांचा स्वभावच तसा काम म्हणजे काम. बारीकातली बारीक गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटत नसे. एखाद्या रस्त्याच्या कडेला असलेली छोटीशी त्रुटी असो, पाण्याच्या लाईनमधील मोजमाप असो किंवा एखाद्या प्रकल्पाची कार्यपद्धती दादा प्रत्येक बाब बारकाईने तपासायचे. म्हणूनच त्यांच्या दौऱ्याची चाहूल लागली की संपूर्ण यंत्रणा सज्ज व्हायची. एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात असायचा “दादा काय विचारतील?”पण त्यांच्या कडक शिस्तीमागे एकच भावना असायची बारामतीवरचं निस्सीम प्रेम.
आपल्या शहराला सर्वोत्कृष्टच मिळालं पाहिजे, हा त्यांचा हट्ट
आपल्या शहराला सर्वोत्कृष्टच मिळालं पाहिजे, हा त्यांचा जणू हट्टच होता. बाहेर कुठे काही उत्तम पाहिलं की ते बारामतीत आणायचं, हा त्यांचा कायमस्वरूपी मानस असायचा. म्हणूनच बारामती केवळ विकसित झाली नाही, तर ती एक आदर्श ठरली.
आज पाहणी दौऱ्यात अजितदादांच्या जागी उभे होते पार्थदादा पवार
आजही तसाच रविवार होता. तसाच विकासकामांचा पाहणी दौरा होता. फरक एवढाच दादा प्रत्यक्षात नव्हते. पण त्यांच्या जागी उभे होते पार्थदादा पवार. आज पार्थ दादांनी अचानक पाहणी दौरा ठरवला. कुठलीही पूर्वसूचना नाही थेट फिल्डवर उपस्थिती आणि ज्या पद्धतीने त्यांनी कामांची चौकशी केली, अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले, तपशील जाणून घेतले, ते पाहताना क्षणभर असं वाटलं दादाच परत आलेत का?
अजितदादांनी बारामतीसाठी पाहिलेलं स्वप्न कृतीत उतरवण्याची तयारी
आजच्या दौऱ्यात त्यांनी फॉरेस्ट परिसरातील बटरफ्लाय गार्डन, अॅडव्हेंचर पार्क आणि उभारणी सुरू असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी कामाची गुणवत्ता, सुरक्षेचे निकष, नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जा आणि भविष्यातील विस्ताराच्या शक्यता याबाबत त्यांनी बारकाईने विचारपूस केली. एखाद्या अवघड जागेवर स्वतः चढून प्रत्यक्ष पाहणी करणं, कामाच्या गुणवत्तेबाबत ठाम भूमिका घेणं आणि “हे अजून चांगलं होऊ शकतं,” असं स्पष्टपणे सांगणं ही लकब पाहताना माझ्यासह उपस्थित अधिकारी आणि नागरिक सगळ्यांनाच दादांची आठवण झाली. काल सुनेत्रावहिनी पवार यांनी ज्या पद्धतीने बैठका घेतल्या, दौरे केले आणि आज पार्थ दादांनी त्याच परंपरेने फिल्डवर उतरून जबाबदारी स्वीकारली, ते पाहून मनाला एक दिलासा मिळतो स्वप्न अजून जिवंत आहे. दादांनी बारामतीसाठी जे स्वप्न पाहिलं, ते केवळ आठवणीत नाही; ते कृतीत उतरवण्याची तयारी आजही दिसते आहे.
दादा नसले तरी त्यांची कार्यपद्धती जिवंत
दादा नसले तरी त्यांची कार्यपद्धती जिवंत आहे. त्यांची शिकवण जिवंत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारामतीला विकासाचं रोल मॉडेल म्हणून कायम ठेवण्याची जिद्द जिवंत आहे. आजच्या त्या दौऱ्याने पुन्हा एकदा जाणवलं नावं बदलली असतील, पण ध्यास तोच आहे. आणि म्हणूनच बारामतीचा विकासप्रवास थांबणारा नाही.
























