Ajit Pawar: राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणासंदर्भातील (Maratha vs OBC Reservation) राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना, आता महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) अंतर्गत पीएच. डी. (P.hd) करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निधी वाटपाचे गंभीर आरोप केले आहेत.
Ajit Pawar: अजित पवार निधी वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप
“बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) आणि सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) यांच्या विद्यार्थ्यांना नियमित निधी दिला जातो, मात्र ओबीसी प्रवर्गातील महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची अडवणूक केली जाते,” असा थेट आरोप महाज्योतीच्या संशोधन विद्यार्थ्यांनी केला आहे. या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली असून, अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी वितरणात सरळसरळ भेदभाव केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.
पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:
1. फेलोशिपचे तात्काळ वितरण
महाज्योती संस्थेअंतर्गत MJPRF-2023 बॅचमधील OBC, VJI YSATI VJNT व SBC प्रवर्गातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून प्रलंबित असलेली १०० टक्के फेलोशिप तत्काळ अदा करण्यात यावी.
2. निधी तात्काळ महाज्योती संस्थेला वर्ग करावा
सदर प्रकरणासंबंधी १२६.१४ कोटी रुपयांचा निधी प्रलंबित असून, तो तात्काळ मंजूर करून महाज्योती संस्थेला वर्ग करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
3, स्टायपंड शीट जनरेट करण्याचे आदेश
नोंदणी दिनांकापासून सादर केलेल्या सर्व सहामाही प्रगती अहवालांच्या आधारे स्टायपंड शीट तात्काळ जनरेट करण्याचे आदेश महाज्योतीच्या संचालकांना देण्यात यावेत, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे.
Ajit Pawar: अजित पवार काय बोलणार?
बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना निधी मिळाला, मग महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची अडवणूक का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्य सरकार आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून या विषयावर काय स्पष्टीकरण दिले जाणार? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Vijay Wadettiwar: ओबीसींच्या विद्यार्थ्यांबाबत सरकारची काय भूमिका आहे? वडेट्टीवारांचा सवाल
दरम्यान, महायुती सरकारने सर्वांना समान निधी वाटपाचा निर्णय घेतला, मग सारथी, बार्टी, महाज्योती यामध्ये भेदभाव कशासाठी? असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. ओबीसींच्या पीएचडी विद्यार्थ्यांना निधी देताना सारथी, बार्टीला दिली. मात्र महाज्योतीची (Mahajyoti) फाईल पडून आहे. त्या विद्यार्थ्यांनी काय केलं? वित्तमंत्री सारथीला देताना चूक झाली असे म्हणत असतील तर ती चूक त्यांनी महाज्योतीला निधी देऊन पुन्हा करावी. या ओबीसी विद्यार्थ्यांची नोंदणी झाली तेव्हापासून द्यायला हवं होतं. त्या विद्यार्थ्यांनी वैतागून पत्र लिहिलं आहे. मी देखील पत्र लिहिले आहे. ओबीसींच्या विद्यार्थ्यांबाबत सरकारची काय भूमिका आहे? हे एकदा सांगून द्यावी, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
आणखी वाचा